नाशिक : नाफेड, तसेच एनसीएफकडून कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या असून, नाफेडने मंगळवारी (दि.२८) सूचना प्रसिद्ध करून कांदा खरेदीसाठी सहकारी संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र व इच्छुक सहकारी संस्था, तसेच कृषी पतसंस्थांकडे कांदा शेतकरी देऊ शकतील.
नाफेड व एनसीसीएफ या दोघा संस्थांकडून प्रत्येकी एक लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असेल. यावर्षी खरेदीपश्चात साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळा'कडे सोपविण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून कांद्याचे भाव गडगडलेलेच असून, शेतकरी चिंतातुर असल्याने या दोघा सरकारी संस्थांनी बाजारभावापेक्षा चांगला भाव द्यावा, अशी मागणी आहे.
कांदा खरेदीतील घोटाळा टाळण्यासाठी यंदादेखील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे कांदा खरेदीचे काम न देता सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल. एप्रिलपासूनच बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी केली असल्याची चर्चा होती. मात्र, कांदा खरेदीला प्रत्यक्ष मे महिन्याचा दुसरा आठवडाच उजाडेल.
२०२६-२७ हंगामासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. केंद्र सरकार सर्वसाधारणपणे मे-जून महिन्यापासून कांदा खरेदी करीत असते. यंदा मात्र खरेदीला लवकर प्रारंभहोणार आहे. रब्बी हंगामातील आवक वाढीच्या काळात योग्य वेळी बाजारात हस्तक्षेप करता यावा आणि पुढील काळात दरात होणारी तीव्र वाढ रोखता यावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
नाफेडच्या आवाहनानुसार, पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन नाफेडने केले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ४ मे दुपारी १३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कांदा खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सहकारी संस्थांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, अधिकाधिक संस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.
मागची दोन वर्षे कांदा खरेदीचे वांधेच
सन २०२४-२५ मध्ये सरकारने ४.७ लाख टन कांदा खरेदी केला होता. त्यानंतर पुढील वर्षी (सन २०२५-२६) पुरवठा तुलनेने स्थिर असल्याने खरेदी ३ लाख टनांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. मात्र, मागील वर्षी काही अडचणींमुळे खरेदी जुलैमध्ये उशिरा सुरू झाली होती. यंदा मात्र आगाऊ खरेदीसाठीच्या तयारीवर भर देण्यात आला आहे.
