Nafed Kanda Kharedi : कांदा बाजारभाव (Kanda Market) सातत्याने घसरत असल्याने शेतकरी नाफेडच्या कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. या खरेदीची संपूर्ण प्रक्रिया झाली असून केवळ तारखेची घोषणा बाकी आहे. ही तारीखही येत्या तीन-चार दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती नाफेडचे नाशिक विभाग व्यवस्थापक आर एम पटनाईक यांनी सांगितले. त्यामुळे नाफेडच्या कांदा खरेदीसाठी (Nafed Kanda Kharedi) शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
एकीकडे कांदा बाजारभावातील घसरण, दुसरीकडे अवकाळी पावसाने (Avkali Paus) केलेले कांद्याचे नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी कधी होईल, याकडे शेतकरी डोळे लावून आहेत. या खरेदीची निविदा एप्रिलमध्ये काढण्यात आली असून जवळपास दोन महिने होत आले आहेत, मात्र खरेदी आज सुरु होईल, उद्या सुरु होईल, या विवंचनेत शेतकरी आहेत.
यंदा नाशिक जिल्ह्यातून नाफेड आणि एनसीसीएफकडून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मागील वर्षी झालेल्या घोळामुळे सरकार विचारपूर्वक पावले उचलत आहेत. यंदा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना सहभागी करून न घेता विविध कार्यकारी सोसायट्यांना सहभागी करून घेत आहेत.
शिवाय या कार्यकारी सोसायट्यांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया सुरु आहे. मात्र केवळ केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वाट पाहत असल्याचे पटनाईक यांनी सांगितले. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत या गोष्टीही पार पडतील, असेही ते म्हणाले.
निविदा प्रक्रिया पार पडली आहे, विविध कार्यकारी सोसायट्यांशी चर्चा झाली आहे. काही निवडक सोसायट्या यात निवडण्यात येतील. आता केवळ केंद्र सरकारकडून येणाऱ्या गाईडलाईनची वाट पाहतो राहतो. येत्या तीन चार दिवसात बैठक घेऊन कांदा खरेदीची तारीख सांगण्यात येईल. शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर व्हाव म्हणून काही बदल करण्यात येत असल्याने विलंब लागतो आहे.
- आर. एम. पटनाईक, व्यवस्थापक, नाशिक विभाग नाफेड
केंद्र सरकारचे कांद्याविषयीचे धोरण हे फक्त ग्राहक धार्जिणे आहे. कांद्याची दरवाढ झाली तर सरकारकडून तत्काळ उपयोजना करून कांदा दर नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाते. परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांना आपला उत्पादित केलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागतो. त्यावेळेस केंद्र सरकार कांदा दरवाढीसाठी कोणत्याही उपाययोजना करत नाही.
नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून यावर्षी बफरस्टॉक साठी तीन लाख टन कांदा घ्यावयाचा आहे. आतापर्यंत किमान दोन लाख टन कांदा खरेदी होणे आवश्यक होते. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांकडून एक किलोही कांदा खरेदी करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने 3000 रुपये प्रति क्विंटल दराने बफर स्टॉक साठीचा कांदा बाजार समित्यांमधून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावा.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना