Mosambi Market : गेल्या २५ वर्षांपासून विकासाला ब्रेक लागलेल्या वडीगोद्री मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारपेठेची सुरुवात झाली. शेतकरी, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन मोसंबीची आवक नोंदवली गेली. (Mosambi Market)
मोसंबीला या ठिकाणी प्रति क्विंटल २२ हजार ५०० रुपये इतका उच्चांक दर मिळाला. (Mosambi Market)
आधुनिक सोयीसुविधांचा आरंभ
या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी १०० टन क्षमतेचा वजन काटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय येथे कडता व २ टक्के पट्टी आकारली जाणार नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे.
पुढील काळात या बाजारपेठेत शेतकरी भवन, कोल्ड स्टोरेज व वेअर हाऊस उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन बाजार समितीचे सभापती अवधूत खडके यांनी दिले.
सभापती अवधूत खडके म्हणाले, गेल्या सव्वादोन वर्षांत मी बाजारपेठेच्या विकासाचा मुहूर्तमेढ रोवला आहे. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी आणखी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकऱ्यांनी आपला माल वडीगोद्री बाजार समितीत आणावा, यासाठी ही बाजारपेठ खुले व्यासपीठ आहे.
समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. ही शेतकऱ्यांची बाजारपेठ आहे. गेल्या २५ वर्षांपासून विकास ठप्प झाला होता. मात्र आता ही गाडी थांबणार नाही, असे ते म्हणाले.
या शुभारंभ सोहळ्याला समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, उपसभापती अरुण घुगे, संचालक केदार कुलकर्णी, भय्यासाहेब हातोटे, शेखर सोळुंके, केदार राठी, शिवाजी कटारे, सोसायटीचे चेअरमन दीपक पवार, अॅड. विजय खटके, ग्रा.पं. सदस्य नारायण वायाळ, बाबासाहेब गावडे, तुकाराम वायाळ, ज्ञानेश्वर गावडे यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.