mango market : उन्हाळा म्हटला की डोळ्यांसमोर येणारे शेंदरी रंगाचे, सुगंधी गावरान आंबे आता हळूहळू इतिहासजमा होत असल्याचे चित्र हिंगोलीत दिसून येत आहे. (mango market)
एकेकाळी घरोघरी आणि आमराईत सहज उपलब्ध होणारा गावरान आंबा आता बाजारात शोधूनही सापडत नाही. त्याऐवजी केवळ कलमी आंब्यांचे वर्चस्व वाढले असून, पारंपरिक चवीची ओळख हरवण्याची भीती व्यक्त होत आहे.(mango market)
गावरान आंब्यांची घटती संख्या
गेल्या काही वर्षांत गावरान आंब्यांच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. वाढती वृक्षतोड, अनियमित पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे जुन्या आमराया नष्ट होऊ लागल्या आहेत.
यंदा तर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने आंब्याच्या मोहरावरच घाव घातल्याने फुलोरा गळून पडला आणि कैऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.
निसर्गाचा मोठा फटका
आंब्याला मोहर आणि कैऱ्या लागलेल्या असतानाच आलेल्या वादळ-पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी, अर्धा उन्हाळा उलटूनही गावरान आंब्याची आवक अत्यल्पच राहिली आहे.
बाजारात कलमी आंब्यांचे वर्चस्व
हिंगोलीच्या बाजारपेठेत सध्या केसर, बदाम, लंगडा आणि दशेरी या कलमी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक आहे.
बाजारात ५० हून अधिक विक्रेते असले तरी गावरान आंबा फक्त चार-पाच विक्रेत्यांकडेच उपलब्ध असल्याचे चित्र आहे.
गावरान आंब्याचे दर वाढले
पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने गावरान आंब्याचे दर वाढले आहेत. सध्या हा आंबा प्रतिकिलो १२० ते १५० रुपयांदराने विकला जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी तो महाग ठरत आहे.
शेतकऱ्यांचा कल बदलला
गावरान आंब्यांच्या तुलनेत कलमी आंब्यांचे उत्पादन अधिक आणि व्यवस्थापन सोपे असल्याने शेतकरीही आता कलमी बागांकडे वळत आहेत. त्यामुळे पारंपरिक गावरान आंब्यांची लागवड कमी होत चालली आहे.
पूर्वी आमराईतून थेट गावरान आंबा बाजारात यायचा. आता झाडेच कमी झाली आहेत. जे थोडेफार आंबे येतात, तेही निसर्गाच्या फटक्यामुळे कमी झाले आहेत.- महंमद मोईन, फळ विक्रेते
गावरान आंब्याची गोडी आणि नैसर्गिक सुगंध आता दुर्मिळ होत चालले आहेत. बदलत्या शेती पद्धती आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे पारंपरिक आंब्यांची ओळख जपण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज अधोरेखित होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे फायदा, कुठे तोटा?
अधिक वाचा : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
