राजू दुतोंडे
गत हंगामात मक्याला मिळालेला चांगला दर आणि शासनाने जाहीर केलेला प्रति क्विंटल २ हजार ४०० रुपयांचा हमीभाव याच्या आशेवर सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मक्याच्या लागवडीवर मोठा भर दिला होता. (Maize Market)
मात्र, निसर्गाची अवकृपा आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.(Maize Market)
तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५० हजार क्विंटल मका केवळ १,५०० ते १,६०० रुपयांच्या दराने विकावा लागत असल्याने हमीभावापेक्षा सुमारे ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.(Maize Market)
चांगल्या भावाच्या अपेक्षेने वाढवली लागवड
मागील हंगामात मक्याला दोन हजार रुपयांहून अधिक दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाचे क्षेत्र कमी करून मक्याची लागवड वाढवली.
चांगला नफा मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मशागत, बियाणे, खते आणि फवारणीवर मोठा खर्च केला. मात्र ऐन कापणीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले.
अवकाळी पावसाचा फटका
दिवाळीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेतातील मक्याची कणसे भिजली. त्यामुळे मक्याचा दर्जा खालावला आणि बाजारात त्याला अपेक्षित दर मिळाला नाही.
काही शेतकऱ्यांनी घाईघाईत मळणी करून मका विक्रीस आणला असता त्यांना केवळ १,००० ते १,२०० रुपये इतकाच दर मिळाला. तर काहींनी थोडा कालावधी थांबून विक्री केली तरी त्यांना जेमतेम १,५०० ते १,६०० रुपये दर मिळत आहे.
हमीभाव केंद्रावर मर्यादित खरेदी
बाजारभाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाकडे हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आणि २०० हून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
मात्र शासनाकडून मिळालेला लक्ष्यांक अत्यल्प असल्याने आतापर्यंत केवळ ३० शेतकऱ्यांकडून सुमारे १,२०० क्विंटल मक्याचीच खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करत आहेत.
५० हजार क्विंटल मक्याची कमी दरात विक्री
खाजगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. मात्र ही खरेदी हमीभावापेक्षा खूपच कमी दरात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उत्पादन खर्च वाढलेला असताना कमी दरात विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
दरम्यान शासनाने हमीभाव केंद्रावरील खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही मका शिल्लक आहे, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
उर्वरित मक्याची खरेदी हमीभावाने होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
पुढील हंगामाबाबत संभ्रम
खरीप हंगामात झालेल्या या नुकसानामुळे सोयगाव परिसरातील शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामात कोणते पीक घ्यायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
निसर्गाचा फटका आणि बाजारभावातील घसरण यामुळे यंदा मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला असून, शासनाने हमीभावाने अधिक प्रमाणात खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अधिक वाचा : Kapus Kharedi : कापूस दरात मोठा ट्विस्ट; मुदतवाढीनंतर बाजारात काय होणार? वाचा सविस्तर
