मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : होळीनंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमान वाढत असताना त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. (Lemon Market)
वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांची मागणी वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दोन लिंबासाठी तब्बल १० रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.(Lemon Market)
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबू सरबत, ज्यूस आणि थंड पेयांकडे वळत आहेत. त्यामुळे रसवंती गृहे, ज्यूस सेंटर, हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबाचा पुरवठा कमी झाल्याने दर सातत्याने वाढत आहेत. (Lemon Market)
सध्या किरकोळ बाजारात पाच लिंबू २० रुपयांना विकले जात असून, काही ठिकाणी दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आवक निम्म्यावर, मागणी दुप्पट
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्याचवेळी बाजारात येणारी आवक निम्म्यावर आल्याने दर वाढले आहेत.
विशेषतः अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठेत लिंबाची उपलब्धता कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परतीच्या पावसाचा उत्पादनावर परिणाम
यंदा हिवाळ्यातील थंडी आणि परतीच्या पावसामुळे लिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. नागपूर, वरूड यांसारख्या मुख्य उत्पादक भागांतून येणारा पुरवठा घटल्याने बाजारातील तुटवडा वाढला आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढल्याने लिंबाचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात तापमान ३४ अंशांवर
फेब्रुवारी संपताच जिल्ह्यातील तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याची ही सुरुवातीची चाहूल यंदा कडक उन्हाळ्याचे संकेत देत असल्याचे वातावरणातून दिसून येत आहे.
रसवंती, हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबू सरबत आणि थंड पेयांचे सेवन करतात. त्यामुळे शहरातील रसवंती गृहे, ज्यूस सेंटर आणि हॉटेल व्यावसायिकांकडून लिंबांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.
घरगुती वापरासाठीही ग्राहकांकडून मोठी मागणी वाढल्याने बाजारपेठेत लिंबू खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
दर वाढण्यामागील कारणे
लिंबाच्या बागांना कडक उन्हाचा फटका बसल्याने फळधारणा कमी झाली आहे. त्याचबरोबर वाहतूक खर्चात वाढ, पाण्याची टंचाई आणि काही भागात झाडांची गळती झाल्याने पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे बाजारात लिंबाचे दर वाढले आहेत.
पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील पंधरा दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे लिंबाचे दर १५ ते २० रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
शीतपेयांच्या दरांवरही परिणाम?
लिंबाच्या वाढलेल्या दरांचा परिणाम शीतपेय उद्योगावरही होण्याची शक्यता आहे. अनेक शीतपेयांमध्ये लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, लिंबाच्या महागाईमुळे शीतपेयांचे दरही वाढू शकतात, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जास्त पावसामुळे लिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाले नाही. तेव्हापासूनच पुरवठ्यावर परिणाम होत असून, आगामी काळात लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.- सुनील रामटेके, शेतकरी
