जळगाव : भडगाव तालुक्यातील कोठली येथील बापूराव जगन्नाथ पाटील या शेतकरी कुटुंबाने ४ एकर केळीची बाग (Banana Export) कष्ट अन मेहनतीने फुलविली आहे. केळीची २१ चीच चांगली रास आली आहे. ही केळी ओमान अन इराण देशाला निर्यात करण्यात आली आहे.
पाटील यांची २२ एकर शेती असून यंदा त्यांनी चार एकरात केळीची लागवड Banana Farming) केली. यातील आतापर्यंत काढलेल्या ५०० क्विंटल केळी मालाला २ हजार १२१ रुपये प्रतिक्किंटल असा चांगला भाव मिळाला आहे. म्हणजेच जवळपास ९ लाखांची ही केळी झाली आहेत. ११ रोजी सायंकाळपर्यंत ही केळी कापून गाडीत खोक्यामध्ये पॅकिंग करून निर्यात करण्यात आली. त्याच रात्री पाऊस अन प्रचंड वादळाने थैमान घातले. गिरणा पट्टयात केळीपीक जमीनदोस्त झाले.
रासायनिक खते, लिक्विड फवारणी, ठिबक सिंचनने लिक्विड देणे, केळी मशागत असा या पिकावर जवळपास ५ लाखांचा खर्च केला आहे. या नैसर्गिक नुकसानीतून थोडे नुकसान वगळता केळीपीक बालंबाल बचावल्याचे दिसून आले. कुटुंबाचे कष्ट अन मेहनतीला फळ आले आणि माल विदेशात निर्यात झाला, अशी प्रतिक्रिया गोकुळ पाटील यांनी यावेळी दिली.
कुटुंब रंगलंय शेतीत
बापूराव जगन्नाथ पाटील यांची २२ एकर शेती आहे. बापूराव पाटील यांचे सुपुत्र गोकुळ पाटील, बाळासाहेब पाटील आदी कुटुंबातील मंडळी शेतीच करतात. त्यांनी जून महिन्यात ४ एकर क्षेत्रात ६०० केळी रोपांची लागवड करण्यात आली.
आम्ही ४ एकर क्षेत्रात एकूण ६०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. तंत्रज्ञानानुसार केळीची बाग फुलवली. हा माल ओमान आणि इराणमध्ये निर्यात झाला आहे. या निर्यातक्षम केळीला २ हजार १२१ रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी भाव मिळाला. यानुसार जवळपास ९ लाखांची केळीचे उत्पन्न मिळाले. आतापर्यंत ५ लाखांचा खर्च झाला. शेवटपर्यंत १४ ते १० लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.
-गोकूळ पाटील, केळी उत्पादक, कोठली, ता. भडगाव