नंदुरबार : कापूस हंगाम आता समारोपाकडे आला आहे. शेतकऱ्यांकडील कापूस संपू लागला असून, शासकीय खरेदी केंद्रांकडे आता फारशा नोंदणी होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र महिनाअखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचा भाव ५०० ते ७०० रुपयांनी घसरला आहे. त्याला कापसाची प्रतवारी, आंतराष्ट्रीय बाजारातील स्थिती कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता शेतकऱ्यांकडील कापूस संपण्याच्या मार्गावर असतांनाच दुसरीकडे खुल्या बाजारातील कापूस भाव घसरू लागले आहेत. ८,५०० रुपयांपर्यंत गेलेला भाव आता ७ हजार ६०० पर्यंत घसरला आहे.
खुल्या बाजारात कापसाचे भाव घसरल्याने नाराजी...
गेल्या आठवड्यापासून अचानक भाव घसरू लागले आहेत. त्याला कारण शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाची प्रत मुख्य कारण आहे. यंदा कापूस बाजार दोन महिने आधीच आटोपता घ्यावा लागत आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत कापूस खरेदी-विक्री सुरू होती. यंदा उत्पादनात घट आल्याने आणि शेतकऱ्यांनी भाव वाढीची वाट न पहाताच कापूस विक्री केला.
नोंदणीसाठी लगबग...
सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर शेतकऱ्यांना तारीख व वेळ मिळते. महिनाअखेर केंद्र बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी ऑनलाईन नोंदणीसाठी लगबग करतांना दिसून येत आहे.
यंदा जिल्ह्यात चार ठिकाणी होते एकाधिकार खरेदी केंद्र
नंदुरबार जिल्ह्यात यंदा सीसीआयचे चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. चारही केंद्रात शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केल्याने यंदा चांगल्या प्रकारे खरेदी झाल्याचे दिसून येत आहे. एकाधिकार खरेदी केंद्रातून यंदा चांगला भाव अर्थात सात ते साडेसात हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. कापूस प्रतवारीनुसार हा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. परंतु आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते.
पोकरा योजनेतून वैयक्तिक लाभासाठी किती अनुदान मिळते, पहा लाभनिहाय मिळणारे अनुदान
