नाशिक : कांद्याचे बाजारभाव प्रचंड गडगडल्याने कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले असून, लासलगावसह अन्य दोन ठिकाणी भाव मिळण्यासाठी आंदोलन झाले. क्विंटलला केवळ ७०० ते ९०० रुपये भाव मिळत असल्याने महिन्याला कोट्यवधींचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
भावात अजून दोन आठवडे तरी वाढ होईल अशी कोणतीही शक्यता नाही, असे प्रमुख निर्यातदार तसेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाढलेली आवक तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये होळीच्या सुट्यांमुळे आठवडाभरात भाव पुन्हा गडगडले. शेतकऱ्यांवर दुहेरी आघात भाव कोसळल्याने होत आहे.
आधीच पडलेले बाजारभाव, उत्पादन खर्चात वाढ, सरकारची निर्यात धोरणातील अनिश्चितता आणि आता युद्धामुळे पूर्णपणे ठप्प झालेली निर्यात यामुळे भाव लगेचच वाढतील, असे वातावरण आज तरी दिसत नाही.
कांदा हा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे. निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारावर अतिरिक्त ताण येऊन भाव कोसळण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. कंटेनरमध्ये दीर्घकाळ कांदा पडून राहिल्यास माल खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ट्रॅक्टरमागे आठ हजारांचे नुकसान
लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, नाशिक या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दर घसरल्याने एकाच दिवसात प्रत्येक क्विंटलमागे २५० ते ३५० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. म्हणजेच जवळपास एका ट्रॅक्टरमागे सात ते आठ हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशच्या १७२४ कोटींतून ४० टक्के घट
१,७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मागील वर्षी भारताला बांगलादेशात निर्यात केलेल्या कांद्यापासून मिळाले होते. यंदा मात्र दोन्ही देशांतील असमन्वयाचा फटका कांदा उत्पादकांना बसल्याने बांगलादेशकडून मिळणारे परकीय चलन ४० टक्क्यांनी कमी होईल, असे निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष विकास सिंग व कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले.
पाकिस्तानचे भारतासारखे २७.८ लाख टन निर्यातीचे लक्ष्य
भारत दरवर्षी २५ लाख ते २८ लाख टन कांदा बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया आदी देशांमध्ये निर्यात करतो. मात्र, गेल्या तीन वर्षात त्यातही १५ लाख टनाची घसरण झाली अन् पाकिस्तानने मात्र २०२५-२६ या पीक वर्षात २७.८ दशलक्ष टन कांदा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते.
ही बाब भारतीय कांदा बाजारपेठेवर परिणाम करणारी ठरली. चीन, पाकिस्तानकडे अतिरिक्त कांदा उपलब्ध होत असल्याने भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषतः मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाई बाजारपेठेत तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. तसेच भारतीय कांद्याचे निर्यात मार्जिन कमी होऊ शकते.
यामुळे दरात सातत्याने घट
बांगलादेश भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश असून, भारत व बांगलादेश सरकारच्या परस्परातील असमन्वयामुळे बांगलादेशला कांदा पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे भारताच्या बाजारपेठेत कांदा मुबलक आहे. त्यात उत्तर भारत व इतर राज्यांमध्ये होळी निमित्त सुट्या होत्या. त्यामुळे कांद्याला मागणी ४० टक्क्यांनी घटली, याशिवाय जवळपास कांद्याने भरलेले २०० पेक्षा जास्त कंटेनर युद्धामुळे जेएनपीटी बंदरावर अडकून आहेत. या सर्वच बाबींचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला असून, कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण झाल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
Tur Market : तुरीच्या किंमती MSP च्या दिशेने, चालू मार्च महिन्यात सरासरी दर कसे राहतील, वाचा सविस्तर
