पुणे : ग्रामीण 'भागात कांदा पिकाने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. सध्या कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असताना बाजारभाव केवळ ९ ते १३ रुपये प्रतिकिलो इतका मिळत आहे. हा दर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असून भांडवली खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे २०२४ नंतर २०२५ प्रमाणे यंदाही २०२६ मध्ये कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
गेल्या हंगामात सात ते आठ महिने कांदा चाळीत साठवूनही अपेक्षित दर मिळाला नाही. यंदा १ महिन्यापूर्वी नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर काही दिवस २५ ते २७ रुपये दर मिळाला होता. मात्र, तो दर टिकला नाही आणि पुन्हा दरात मोठी घसरण ती ८ ते १२ रुपयांवर आली.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून खते, बियाणे, औषधे आणि मजुरीसाठी मोठा खर्च केला आहे. गेल्या काही वर्षांत कृषी निविष्ठांचे दर दुप्पट-तिप्पट वाढले आहेत. मात्र, शेतमालाच्या दरात त्यानुसार वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
कांदा विकावा की साठवावा? प्रत्येक शेतकऱ्यांसमोर पेच असून उत्पादन खर्चापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. कांद्याच्या बाजाराची उतरती कळा त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे, कारण प्रत्येक शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून कर्ज काढून शेती करत आहेत; पण कांदा दराने धक्का दिला आहे. सध्याच्या ९ ते १२ रुपये भावात शेतकरी तोट्यात जात आहे.- शरद डुंबरे, प्रगतशील शेतकरी
"शेतकऱ्याच्या हातात पैसा आला की बाजारपेठेला चैतन्य येते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कांदा, सोयाबीन आणि टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने संपूर्ण बाजारपेठेचे अर्थकारण मंदावले आहे. शेतकरी सक्षम असेल तरच व्यापारी, दुकानदार आणि इतर व्यवसाय टिकू शकतात. शेतकऱ्याचे उत्पन्न घटले की त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होतो. बाजारपेठेचा कणा असलेल्या शेतकऱ्यालाच योग्य दर मिळत नसेल, तर संपूर्ण आर्थिक साखळीवर परिणाम होतो.- नितीन पन्हाळे, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, ओतूर.
Web Summary : Crashing onion prices devastate farmers, fetching only ₹9-13/kg. Production costs soar, leaving farmers in debt and dilemma. Market slowdown impacts traders too.
Web Summary : प्याज की कीमतों में भारी गिरावट से किसान परेशान हैं, केवल ₹9-13/kg मिल रहा है। उत्पादन लागत बढ़ने से किसान कर्ज में डूब रहे हैं। बाजार में मंदी से व्यापारी भी प्रभावित।