वाशिम : नजीकच्या हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Halad Market) वसमत येथे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित झाले, तेव्हापासून हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. दरदेखील प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक लाभदायी ठरले आहे.
दुसरीकडे मात्र सोयाबीनच्या दरात (Soyabean Market) सतत घसरण होत असून, यंदाच्या खरीप हंगामात त्यामुळेच हळदीचे लागवड क्षेत्र वाढून सोयाबीनचे पेरणी क्षेत्र घटण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.
वाशिम जिल्हा (Washim District) हा राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांपैकी एक असून, खरीप हंगामात ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक (७५ टक्क्यांवर) क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. मात्र, गतवेळच्या खरीप हंगामानंतरच या पिकाला बाजारात समाधानकारक दर मिळाले नाही.
यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्या तुलनेत हळदीला उच्च दर मिळत असल्याने अधिकांश शेतकरी यंदा सोयाबीनला फाटा देऊन हळदीकडे वळणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रक्रिया उद्योगाचा अभाव; शेतकऱ्यांचे नुकसान
'सोयाबीन हब' म्हणून वाशिम जिल्ह्याची सर्वदूर ओळख पसरलेली आहे. असे असताना या जिल्ह्यात अद्याप सोयाबीनवर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग उभा होऊ शकला नाही. ही बाब दर घसरण्यास कारणीभूत ठरली असून शेतकऱ्यांना त्यामुळेच दरवर्षी नुकसान सहन करावे लागत आहे.
सोयाबीनचे बाजारभाव
सोयाबीनचे बाजार भाव पाहिले असता माजलगाव बाजारात सरासरी 04 हजार 100 रुपये, सोलापूर बाजारात 4 हजार 150 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 57 रुपये, लातूर बाजारात 04 हजार 250 रुपये, अकोला बाजारात 4 हजार 100 रुपये, वाशिम बाजार 4250 रुपये, उमरखेड बाजारात 03 हजार रुपये तर सिंधी बाजारात 3800 रुपयांचा दर मिळाला.
हळदीचे बाजारभाव
तर हळदीचे बाजारभाव पाहिले असता नांदेड बाजारात सरासरी 12050 रुपये, भोकर बाजारात 9 हजार 750 रुपये, वाशिम बाजारात 1150 रुपये, तर मुंबई बाजार सर्वाधिक 22 हजार रुपये वसमत बाजारात 12 हजार 225 रुपये, तर सांगली बाजारात 12850 रुपयांचा दर मिळतो आहे.