इस्माईल जहागीरदार
इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम हिंगोली जिल्ह्यातील हळद व्यवसायावर झाला आहे.(Halad Export)
वसमत येथील बाजारपेठेतून दररोज आखाती देशांमध्ये होणारी सुमारे ३०० टन हळदीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात हळदीच्या दरावर मोठा दबाव निर्माण झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.(Halad Export)
हिंगोली जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा हळद उत्पादक पट्टा मानला जातो. विशेषतः वसमत येथील हळदीला देशांतर्गतच नव्हे, तर दुबईसह आखाती देशांमध्ये मोठी मागणी आहे.
'पिवळे सोने' म्हणून ओळख असलेल्या या हळदीची निर्यातच सध्या बंद पडल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत.
दररोज १५ ते २० गाड्यांची निर्यात बंद
यापूर्वी वसमत मोंढ्यातून दररोज १५ ते २० ट्रक (सुमारे ३०० टन) हळद दुबईकडे रवाना होत होती. प्रत्येक ट्रकमध्ये सुमारे २५ टन हळद निर्यात केली जात होती. मात्र युद्धामुळे वाहतूक आणि व्यापार साखळी विस्कळीत झाल्याने ही निर्यात पूर्णतः थांबली आहे.
केवळ बांगलादेशपुरती मर्यादित निर्यात
सध्या अत्यल्प प्रमाणात, म्हणजेच दररोज २ ते ३ गाड्या हळद बांगलादेशासाठी पाठवली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साठा बाजारातच अडकून पडला आहे.
दरात मोठी घसरण
निर्यात बंद पडल्यामुळे हळदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांत प्रतिक्विंटल २,००० ते २,५०० रुपयांची घसरण झाली असून सध्या बाजारात हळदीला ११,५०० ते १३,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
शेतकरी-व्यापाऱ्यांची चिंता वाढली
निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली असून मागणी घटल्याने दर कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांनाही साठा अडकून पडल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा
व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत स्थानिक बाजारावर ताण कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
अधिक वाचा : Tur Bajarbhav : तूर ८ हजाराच्या उंबरठ्यावर ; ‘या’ ठिकाणी अजूनही कमी दर
