गडचिरोली : जिल्ह्याच्या जंगल परिसरात आणि शेतशिवारात असलेल्या मोहफुलांच्या झाडांना यावर्षी मोठा बहर आला आहे. अवकाळी पावसाने पाठ फिरवल्याने मोहफुलांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, उत्पादन वाढीची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिकिलो १० रुपयांनी दरही वाढले आहेत. यामुळे शेतकरी आणि मोहफुले वेचणारे नागरिक सुखावले आहेत.
मार्च महिन्याच्या मध्यापासून मोहफुले गळण्याचा हंगाम सुरू झाला असून, तो एप्रिल मध्यापर्यंत चालणार आहे. या एका महिन्याच्या कालावधीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. पहाटेपासूनच आबालवृद्ध मोहफुले वेचण्यासाठी रानात धाव घेताना दिसत आहेत. वेचलेली फुले वाळवणे आणि त्यांची साठवणूक करणे यात शेतकरी गुंतले आहेत.
विशेष म्हणजे, या पिकासाठी कोणताही खर्च करावा लागत नसल्याने हे उत्पन्न पूर्णतः फायदेशीर ठरते. मोहफुलांपासून लाडू, बिस्किटे, जॅम, सरबत आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ बनवता येतात. मात्र, जिल्ह्यात अशा मोठ्या प्रक्रिया उद्योगांचे जाळे नसल्याने ही फुले केवळ मद्यनिर्मितीसाठीच व्यापाऱ्यांकडे जातात.
पौष्टिक मोहफुलांमध्ये गुणधर्म, आरोग्याला लाभ
मोहफुले हे निसर्गाचे एक वरदान आहे, परंतु दुर्दैवाने त्याची ओळख केवळ 'दारू' बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल एवढीच मर्यादित राहिली आहे. या मोहफुलांपासून अनेक पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. मात्र, त्यांना बाजारपेठ नसल्याने खाद्य पदार्थ तयार केले जात नाही.
५० रुपये किलो दराने खरेदी
सध्या बाजारपेठेत वाळलेल्या मोहफुलांना साधारणपणे ५० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. मागील वर्षी ४० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. पावसाळ्यानंतर मोहफुलाच्या दरात वाढ होते. या कालावधीत मोहफुलांचा साठा कमी होत असल्याने तुटवडा निर्माण होऊन भाववाढ होते.
यावर्षी मोहफुले चांगली आली असून, उत्पादनात निश्चितच वाढ होईल. बाजारभावही समाधानकारक मिळतील अशी आशा आहे.
- नक्टू रंधये, शेतकरी
शरबती गव्हाला क्विंटलमागे काय दर मिळतोय, वाचा जिल्हानिहाय आजचे गहू बाजारभाव
