Dhanya Bajarbhav : यंदाच्या उन्हाच्या झळ्यांसोबतच धान्य बाजारातही मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, या बदलांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.(Dhanya Bajarbhav)
ज्वारी आणि बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला, तरी गव्हाच्या दरात झालेली सुमारे १० टक्क्यांची घसरण गहू उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.(Dhanya Bajarbhav)
ज्वारी उत्पादकांना भाववाढीचा फायदा
बाजारात चांगल्या प्रतीच्या ज्वारीची टंचाई निर्माण झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. मध्यम प्रतीची ज्वारी ३,२०० ते ३,७०० रुपये, तर बार्शी ज्वारी ५,२०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे.
विशेषतः सोलापूर परिसरातील ज्वारी बाजारात येत असल्याने दर काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. अन्यथा ज्वारीने ७ हजारांचा टप्पा गाठला असता, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.
तांदूळ उत्पादकांनाही दिलासा
बासमती तांदळाची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने तांदळाच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बासमती तांदूळ ५० ते १३० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून अधिक दर मिळत असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
गहू उत्पादकांसाठी चिंता वाढली
गव्हाच्या दरात घट झाल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गव्हाची आवक होत असल्याने दरावर दबाव आला आहे.
सध्या शरबती गहू ४,००० ते ४,५०० रुपये, तर इतर गहू २,६०० ते ३,२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दरात सुमारे १० टक्क्यांची घट झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी मिश्र चित्र
एकीकडे ज्वारी आणि तांदूळ उत्पादकांना भाववाढीचा फायदा होत असताना, दुसरीकडे गहू उत्पादकांना कमी दरामुळे आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे धान्य बाजारातील ही स्थिती शेतकऱ्यांसाठी मिश्र ठरत आहे.
साठवणूक आणि विक्रीत बदल
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापारी धान्याची साठवणूक करत आहेत. चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत काही शेतकरी ज्वारी आणि तांदूळ साठवून ठेवण्याचा निर्णय घेत आहेत, तर गहू उत्पादकांना कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी काळात काय?
बाजारातील आवक, निर्यात धोरण आणि हवामान परिस्थिती यावर पुढील दर अवलंबून राहणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, ज्वारी आणि तांदळातील तेजी काही काळ टिकू शकते, तर गव्हाच्या दरात आवक कमी झाल्यास पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील स्थिती लक्षात घेऊन विक्रीचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
हे ही वाचा सविस्तर:Gahu Bajarbhav: गव्हाला ५,२०० पर्यंत भाव; पण 'या' बाजारात दर कोसळले
