जळगाव : कापूस उत्पादकांसाठी 'पांढरं सोनं' मानल्या जाणाऱ्या खान्देशात यंदा कापसाचा हंगाम अपेक्षेपेक्षा लवकरच संपल्याचे चित्र आहे. भारतीय कापूस निगमने (सीसीआय) कापूस खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारपेठेत कापसाची आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी घटले आहेत. वाढीव दराच्या अपेक्षेने कापूस घरात राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांची यामुळे निराशा झाली आहे. कमी दरात माल विकण्यापेक्षा तो घरातच ठेवणे शेतकऱ्यांनी पसंत केल्याने खासगी जिनिंगमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
खान्देशातील कापूस खरेदीची आकडेवारी
खासगी बाजार - ५ लाख गाठी
सीसीआय - १ लाख ५० हजार गाठी
एकूण खरेदी - ७ लाख ५० हजार गाठी
शासकीय खरेदी केंद्रांवर मुदतवाढ देण्यात आली असली तरी, तेथे येणाऱ्या कापसाची गुणवत्ता खराब असल्याचे सांगत माल नाकारला जात आहे.
बड्या शेतकऱ्यांकडे १ लाख गाठी शिल्लक
खान्देशात अजूनही १ लाख गाठी बनतील एवढा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. हा शिल्लक माल प्रामुख्याने बड्या शेतकऱ्यांकडे असून, भाववाढीच्या अपेक्षेने त्यांनी तो विक्रीसाठी काढलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता हा माल आता थेट पुढच्या हंगामातच बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.
दरम्यान, यंदा खान्देशात कापसाची लागवडही मोठ्या प्रमाणात घटली होती, लागवड झालेल्या कापसाच्या उत्पादनात अतिवृष्टीमुळे मोठी घट झाल्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खान्देशात ४० टक्के उत्पादन घटले आहे. हंगामाच्या शेवटी हंगामाच्या शेवटी शिल्लक असलेल्या कापसामध्ये ओलावा किंवा इतर दोष असल्याचे कारण दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.
