मानवत : पांढऱ्या सोन्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या दरांनी हंगामातील सर्वाधिक उच्चांक गाठत प्रतिक्विंटल तब्बल १०,०४५ रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. (Cotton Market)
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली तेजी कायम असून खाजगी व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Cotton Market)
खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर कापसाने घेतलेल्या या उसळीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवला होता. आता दर वाढल्याने तो विक्रीसाठी बाजारात आणण्याची लगबग सुरू झाली आहे.
मार्चपासून सुरू असलेली भाववाढ कायम
या हंगामात कापसाच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र १८ मार्चपासून भाववाढीचा आलेख झपाट्याने वर गेला. त्या दिवशी कापसाने ८ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर २९ एप्रिल रोजी दर ९ हजारांच्या पुढे गेले आणि आता १४ मे रोजी झालेल्या लिलावात कापसाला हंगामातील सर्वाधिक १०,०४५ रुपयांचा भाव मिळाला.
या दिवशी बाजार समितीत २ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. लिलावात किमान ९,८८० रुपये, तर सरासरी ९,९६० रुपये प्रतिक्विंटल दर नोंदवण्यात आला.
बाजार समितीने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सुरुवातीला मानवत बाजार समितीने कापूस खरेदीची अंतिम मुदत १५ मे निश्चित केली होती. मात्र वाढत्या भावामुळे अनेक शेतकरी अजूनही कापूस विक्रीसाठी आणत असल्याचे लक्षात घेऊन बाजार समितीने मोठा निर्णय घेत खरेदीची मुदत २५ मेपर्यंत वाढवली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वाढत्या दरांचा फायदा घेण्यासाठी बाजारात कापूस आणण्याची गर्दी वाढत आहे.
४ लाख क्विंटल खरेदीचा विक्रमी टप्पा
भारतीय कापूस महामंडळ (CCI) ने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी प्रक्रिया थांबवली होती. मात्र त्यानंतरही खाजगी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू ठेवली. परिणामी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने यंदा तब्बल ४ लाख क्विंटल कापूस खरेदीचा विक्रमी टप्पा पार केला आहे.
बाजार समिती प्रशासनाच्या मते, खाजगी व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे दरात तेजी कायम असून आगामी काही दिवसांतही बाजारात चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा धोका; कापूस वेळेत विकण्याचे आवाहन
पुढील काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना कापूस सुरक्षितपणे आणि वेळेत यार्डात आणण्याचे आवाहन केले आहे.
बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लिलाव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि शेतकऱ्यांना चढत्या दराचा थेट फायदा मिळावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
मजुरांच्या कमतरतेमुळे व्यापाऱ्यांची चिंता
खरिपाचा हंगाम जवळ आल्याने जिनिंग कारखान्यांतील परराज्यातील मजूर आपल्या गावी परतण्याच्या तयारीत आहेत. तसेच तांत्रिक कामगारही या काळात निघून जातात. त्यामुळे पुढील काळात जिनिंग प्रक्रिया अडचणीत येऊ शकते.- रामनिवास सारडा, व्यापारी
त्यामुळे शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा फायदा घेत वेळेत कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
दरवाढीमुळे मानवत बाजार समिती परिसरात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. अनेक शेतकरी वाढलेल्या दरामुळे समाधानी असून खरिपाच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळाल्याची भावना व्यक्त करत आहेत.
कापसाने गाठलेला १० हजारांचा टप्पा हा या हंगामातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आगामी दिवसांत बाजारातील तेजी कायम राहणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Cotton Market : कापूस दरात मोठी उसळी; मालामाल 'सीसीआय', शेतकरी मात्र हताश
