Cotton Market : नांदेडच्या सीमावर्ती परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आदिलाबाद बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी निघालेल्या वाहनांना तेलंगणा प्रशासनाने सीमा नाक्यावरच थांबवून परत पाठवले. (Cotton Market)
दरम्यान, महाराष्ट्रातील सीसीआय केंद्रे सुरू नसल्याने आणि विदर्भातही खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अचानक 'कापूस नाकाबंदी'ने सीमावर्ती शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.(Cotton Market)
ऐन कापूस हंगामात तेलंगणा प्रशासनाने सीमावर्ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. मांडवी–आदिलाबाद या मार्गावरील लक्ष्मपूर (तेलंगणा) येथे कापूस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, आदिलाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी गेलेल्या १०–१५ ट्रकांना परत फिरविण्यात आले.(Cotton Market)
तेलंगणाच एकमेव पर्याय… पण तोही बंद!
किनवट तालुक्यातील चिखली येथील सीसीआय खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. विदर्भातील सरकारी केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे जवळची आणि दर चांगला मिळणारी आदिलाबाद हीच एकमेव प्रमुख बाजारपेठ सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची होती.
मात्र, तेलंगणा प्रशासनाने आता 'कापूस नाकाबंदी' लागू करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कापूस वाहन सीमा ओलांडू दिले नाही.
सीमेवर कडेकोट बंदोबस्त
लक्ष्मपूर येथे तैनात पथकात तेलंगणा पोलीस, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, एक्साईज विभाग, कृषी सहायक अशा अधिकाऱ्यांची संयुक्त तपासणी टीम बसवली आहे.
वाहन तपासणीमध्ये हलगर्जीपणा दिसल्यास कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, असा कठोर आदेशही देण्यात आला आहे.
कापूस विकायचा कुठे?
जिल्ह्यातील शेतकरी सांगतात की,
महाराष्ट्रात कापसाला कमी भाव मिळतो आहे.
सीसीआय केंद्रे उशीरा सुरू झाले आहे.
मध्य प्रदेश–तेलंगणा दर तुलनेत जास्त
म्हणून दरवर्षी ते कापूस तेलंगणात विकतात.
परंतु यंदा सीमा अडवल्याने शेतकरी अक्षरशः कापूस हातात घेऊन अडकले आहेत.
शेतकऱ्यांची मागणी : कापूस विक्रीचा मार्ग तातडीने मोकळा करा
शेतकऱ्यांनी बंदीबाबत विचारणा केली असता, सीमावर्ती नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी केवळ 'हा जिल्हा प्रशासनाचा आदेश आहे' इतकेच उत्तर दिले.
पिंपळगाव सरपंच दत्ता गुरणुले, तसेच विनोद अड्डीवार, बालाजी जेंगटे, अविनाश शेंडे यांनी नाक्यावर जाऊन माहिती घेतली आणि शेतकऱ्यांची अडचण पुढे मांडली.
कापूस वेचणी पूर्ण झाली आहे, पैसे हवे आहेत… पण विक्रीचा मार्गच बंद! सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, असे शेतकरी सांगतात.
तेलंगणात कारवाईचा धोका
मागील काळातही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर तेलंगणा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आता शेतकरी भीतीत असून, कापूस विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सीमावर्ती भागातील शेतकरी प्रशासनाकडे एकच मागणी करत आहेत की, कापूस विक्रीसाठी आदिलाबाद बाजार सुरु करावा, अन्यथा मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.
