जळगाव : रब्बी हंगामातील गव्हाची काढणी जवळपास ९९ टक्के पूर्ण झाली असून, आता बाजार समित्यांमध्ये गव्हाची मोठी आवक होत आहे.
शासनाकडून गव्हाचा हमीभाव २ हजार ४२५ रुपये असताना, जळगाव बाजार समितीत मात्र अवघ्या २२०० ते अडीच हजार रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे.
विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येणारा दर आणि प्रत्यक्ष ग्राहकांना विकला जाणारा दर यात किमान १००० रुपयांचा फरक दिसून येत आहे. सुरुवातीला गव्हाची आवक कमी असताना शेतकऱ्यांना २६०० ते २८०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र, आता लोकवन जातीच्या गव्हाचे दर कोसळले आहेत.
बाजार समितीत लोकवन गहू २००० ते २२०० रुपयांनी घेतला जात आहे, तर शरबती गव्हाला २५०० ते २८०० रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे, हाच गहू व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ३२०० ते ३९०० रुपयांपर्यंतच्या दरात विक्री केला जात आहे.
गुणवत्तेचा बागुलबुवा
व्यापाऱ्यांकडून गहू साफ करून दिला जात असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, सध्याचे शेतकरी यंत्राद्वारे गहू काढतानाच तो स्वच्छ करून आणतात, तरीही गुणवत्तेचे कारण काढून व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रुपयांची नफेखोरी केली जात आहे. सुरुवातीला २८०० रुपयांपर्यंत असलेले दर आवक वाढताच पाडण्यात आले आहेत.
आम्ही आता यंत्राद्वारे गहू काढतानाच तो स्वच्छ करण्यावर भर देतो, जेणेकरून माती किंवा कचरा राहणार नाही. तरीही व्यापारी गुणवत्तेचे कारण काढून भाव पाडतात. स्वतःचा घाम गाळून पिकवलेल्या गव्हाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असेल, तर आमचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. बाजारात ग्राहकांना मिळणारा दर आणि आम्हाला मिळणारा भाव यात मोठा फरक आहे, ही लूट थांबली पाहिजे.
- जनार्धन चौधरी, गहू उत्पादक शेतकरी, आव्हाणे
