अनिल भंडारी
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळू लागली आहे. (Akshaya Tritiya Mango Market)
हापूस, केशर आणि लालबाग या विविध जातींच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून, सणासुदीची संभाव्य ग्राहकवाढ लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी आंब्यांची खरेदी वाढवली आहे. (Akshaya Tritiya Mango Market)
यंदा अक्षय तृतीयेच्या कालावधीत सुमारे ४० ते ५० टन आंबे बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.(Akshaya Tritiya Mango Market)
हापूस-केशरला 'लालबाग'ची टक्कर
बाजारात कोकणातील हापूस आणि केशर या पारंपरिक जातींसोबतच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणाऱ्या 'लालबाग' आंब्याची आवक वाढली आहे.
जास्त फायबर, गोड चव आणि आकर्षक रंगामुळे 'लालबाग'ला ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदा आंबा बाजारात स्पर्धा चांगलीच रंगली आहे.
विविध राज्यांतून आवक
बीडच्या बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू येथील मँगो मार्केटमधून आंबे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.
यासोबतच कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील लातूरसह इतर जिल्ह्यांतून केशर आंब्याची आवक सुरू झाली आहे.
सध्या दर तेजीत
सध्या आंब्यांची आवक मर्यादित असल्यामुळे दर तेजीत आहेत.
डझननिहाय दर
हापूस (रत्नागिरी): १,२००–१,३०० रु.
हापूस (देवगड): ९००–१,००० रु.
हापूस (मद्रास): ६००– ८०० रु.
किलोनिहाय दर
रत्नागिरी केशर: ३०० रु.
केशर: २००– २४० रु.
दशेरी: १५०– १८० रु.
बदाम: १५० रु.
लालबाग: १००– १२० रु.
वाहतूक खर्चामुळे दर वाढले
गत महिन्यातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या दरावर त्याचा परिणाम झाला असून ग्राहकांना किंचित महागाईचा सामना करावा लागत आहे, असे व्यापारी अलिम बागवान यांनी सांगितले.
१ मेनंतर आवक वाढण्याची शक्यता
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने यंदा आंब्याची आवक काहीशी उशिरा होत आहे. मात्र १ मेनंतर आवक वाढेल आणि दरही स्थिरावतील, असा अंदाज आंबे विक्रेते व्यक्त करत आहेत.
अक्षय तृतीयेनंतर बहुतांश कुटुंबांत आमरसाचा बेत आखला जात असल्याने सध्या बाजारात चांगली उलाढाल सुरू आहे.
गावरान आंब्याची प्रतीक्षा
अक्षय तृतीयेला गावरान आंब्यांना विशेष मागणी असते. मात्र यंदा त्यांची आवक मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कलमी आंब्यांच्या आमरसालाच ग्राहक पसंती देत आहेत.
रोजगारालाही चालना
बीड शहरात सुमारे १५ ठोक व्यापारी आणि १०० पेक्षा अधिक किरकोळ विक्रेते आंबा विक्री व्यवसायात कार्यरत आहेत. या हंगामात जवळपास २०० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बीडचा आंबा बाजार गजबजला असून विविध जातींच्या आंब्यांमुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
सध्या दर तेजीत असले तरी पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दरात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनीही खरेदीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Bajarbhav : हळदकोंडी! इंडेक्सवर तेजी, पण बाजारात भाव घसरले; कारण काय?
अधिक वाचा : Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला सुपरहिट; बाजाराचा नेमका ट्रेंड काय? वाचा सविस्तर
