गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदीला प्रत्यक्षात गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामात धान खरेदीसाठी २६ धान खरेदी केंद्रांना फेडरेशनने आदेश दिले आहे. पण, प्रत्यक्षात ६२ केंद्रांवरून आतापर्यंत ८५ हजार ४७६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने २३६९ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. खरिपात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन १८९ धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते.
धान खरेदीला सुरुवात
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६२ धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ७८ हजार ७३५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी १९६१ शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात ६२ केंद्रांवरून ८५ हजार ४७६ क्विंटल धानाची विक्री केली आहे. विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत २० कोटी २४ लाख ९४ हजार रुपये आहे.
रब्बीतील ७२ कोटी रुपयांचे चुकारे थकले
खरीप हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांना रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. १३ हजारावर शेतकऱ्यांचे ७२ कोटी रुपयांचे चुकारे थकले असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासन चुकाऱ्यांसाठी निधी केव्हा देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
