जळगाव : सध्या जिल्ह्यात कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ३०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. २०२२ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच कापसाने ८ हजारांचा टप्पा ओलांडला असला, तरी या वाढलेल्या भावाचा आनंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही.
जिल्ह्यात यंदा कापसाचा हंगाम संपत आला आहे. जवळपास ६.५० लाख गाठींची आवक झाली आहे. जेव्हा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस होता, तेव्हा खासगी बाजारात ७ हजार २०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंतचे दर मिळत होते.
घरगुती गरजा आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जिल्ह्यातील ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस मार्च महिन्यापर्यंतच विकून टाकला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आता केवळ ५ ते १० टक्केच कापूस शिल्लक आहे. त्यामुळे बाजारपेठेत आता विक्रमी भाव असताना शेतकऱ्यांची 'कोठारे' मात्र रिकामी झाली आहेत.
भाववाढीची कारणे?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे.
सरकीचे भाव ३८०० वरून ४२०० पर्यंत वाढले आहेत.
सरकीप्रमाणे गाठींचे दरदेखील ५४ हजारांवरून ५७ हजारांपर्यंत पोहोचले आहेत.
भारतात एकूण ३ कोटी ४० लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता होती. तेच उत्पादन ४० लाख गाठींनी कमी झाले आहे.
एकूण उत्पादनात आधीच २० ते ३० टक्क्यांची घट होती. त्यातच आणखी घट झाली आहे. त्यात अचानक मागणी वाढल्याने कापसाचे दर वाढल्याचे बोलले जात आहे.
भाववाढीचे चित्र..
विक्रमी दर : ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल (७ एप्रिल रोजी)
संधी हुकली : ९५ टक्के कापूस विक्री झाल्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ हुकला
आवक : जिल्ह्यात आतापर्यंत ६.५० लाख गाठींची आवक पूर्ण
भविष्य : पुढील हंगामात कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याचा अंदाज
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला वाढलेली मागणी, त्यात सरकीच्या दरात झालेली वाढ यामुळे कापसाच्या दरात वाढ झाली आहे. कापसाचे दर ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस थोड्याफार प्रमाणातच शिल्लक आहे.
- प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन
