प्रथमेश गुरव
या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. लांबलेला पाऊस, अवकाळी आणि आता वाढत्या उष्णतेमुळे उत्पादनात आधीच घट झालेली असताना, उरल्यासुरल्या मालाला मिळणाऱ्या 'कॅनिंग' दरातही मोठी घसरण झाल्याने बागायतदार अक्षरशः हतबल झाला आहे.
बागायतदारांना विश्वासात न घेता केवळ मोठ्या कंपन्यांच्या फायदासाठी हे दर जाणीवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप होत असून, आता शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे आंबा कॅनिंग?
आंबा हंगाम संपल्यानंतरही वर्षभर त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी पिकलेले किंवा कच्चे आंबे विशिष्ट प्रक्रियेद्वारे हवाबंद बरण्यांमध्ये साठवले जातात. तुकडे साखरेच्या पाकात गरम करून, निर्जंतुक करून 'वॉटर बाथ' पद्धतीने सील केले जातात, यालाच कॅनिंग म्हणतात.
महत्त्वाच्या मागण्या आणि उपाययोजना
आंबा बागायतदारांचे नुकसान टाळण्यासाठी खालील मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
• जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक: कॅनिंगचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधी आणि कॅनिंग कंपन्यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी.
• खर्च आधारित दर : तोडणी, मजुरी, फवारणीचा खर्च आणि बागेची खरेदी किंमत यांचा विचार करून शेतकऱ्याला किमान नफा मिळेल, असा सन्मानजनक दर जाहीर करावा.
• शासकीय नियंत्रण: खासगी कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी बाजारात मक्तेदारी निर्माण करत असून, यावर शासनाने देखरेख आणि कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
दरात मोठी 'चढाओढ'
अक्षय्य तृतीयेला कॅनिंगचा दर प्रतिकिलो ५४ ते ५५ रुपये होता. त्यानंतर तो ४८ रुपयांवर आला आणि आता थेट २८ ते ३० रुपयांवर येऊन ठेपला आहे. गेल्यावर्षी हाच दर ५५ रुपयांपर्यंत होता. खते, औषधे आणि वाढलेली मजुरी पाहता हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही.
बहुउपयोगी पल्प
कॅन केलेल्या आंब्याचा वापर आमरस, जॅम, जेली, सरबत, आईस्क्रीम, स्मूदी आणि केक बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय आमचूर, लोणचे आणि हॉटेल व्यवसायातही याला मोठी मागणी असते. केवळ स्थानिकच नाही, तर जागतिक स्तरावर याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
संताप आणि आंदोलन : योग्य दराअभावी बागायतदारांनी
आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Mango farmers in Konkan are struggling as canning rates plummet due to weather changes and company dominance. Farmers demand government intervention to set fair prices considering production costs. Protests are erupting, urging immediate action to prevent further losses.
Web Summary : कोंकण में आम किसान मौसम के बदलाव और कंपनी के प्रभुत्व के कारण कैनिंग दरों में गिरावट से जूझ रहे हैं। किसान उत्पादन लागत को ध्यान में रखते हुए उचित मूल्य निर्धारित करने के लिए सरकारी हस्तक्षेप की मांग करते हैं। नुकसान रोकने के लिए तत्काल कार्रवाई का आग्रह करते हुए विरोध प्रदर्शन हो रहे हैं।