युनूस नदाफ
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील हळद, केळी व कांद्याची काढणी वेगाने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाजारात दाखल होत असताना त्याच्या किमतीत घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्धामुळे आखाती देशात निर्यात होणाऱ्या हळद, केळी, कांदा तसेच भाजीपाला पिकांच्या दरात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मागील आठवडाभरापासून मध्यपूर्व भागात सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात व्यवहारांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम हळूहळू भारतातील बाजारपेठेवरही जाणवू लागला आहे. आखाती देशांतून आयात होणाऱ्या काही वस्तूंच्या किमतीत वाढ होत असून घरगुती गॅस तसेच सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे.
इराण-इस्रायल संघर्षांचा परिणाम पुढील काळात भारतातील शेतीमालाच्या बाजारपेठेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अर्धापूर तालुक्यातून होणारी कांद्याची निर्यात मंदावल्याने कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नाही. तसेच इराण, इराक, कुवेत या देशांत मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात होते. सध्या युद्धाच्या परिणामामुळे केळीला केवळ ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
१५ ते १८ क्विंटलपर्यंतच उत्पादनही घटले
यावर्षी हळदीवर विविध रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी एका एकरातून सरासरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळत असे; मात्र यंदा ते केवळ १५ ते १८ क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न पडत नाही. त्यातव आता युद्धामुळे आशा मावळली आहे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
