गत १५ दिवसांपासून किराणा अन्नधान्य, डाळी, कडधान्य, तेल यामध्ये मोठ्या प्रमाणात किंमती भडकल्याने सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलापासून तर तांदळापर्यंत सर्वच भावांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने किरकोळ व्यापारीसुद्धा त्रस्त झाले आहेत. १५ दिवसात शेंगदाणा प्रतिकिलो ४० रुपये वाढला, तर तूरडाळ प्रतिकिलो २० रुपये वाढली आहे.
तसेच खोबऱ्यामध्ये २० ते ३० रुपये किलोमागे वाढ झाली आहे. तांदळामध्ये पाच ते सात रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. त्याप्रमाणेच गहू दोन रुपये किलो, उडीद डाळीमध्ये प्रति किलो १५ रुपये भाववाढ झाली आहे. सोयाबीन तेल १३५ रुपये लिटरवरून १४५ रुपये लिटरवर पोहोचले आहे.
सूर्यफूल तेल १५५ वरून १६५ रूपये लिटर झाले आहे. तेल पिंपामागे दीडशे रुपये भाववाढ झाली. साखर प्रति क्विंटल १०० रुपये भाव वाढ झाली आहे. कोलम तांदूळ, चिनोर तांदूळ, एचएमटी तांदूळ सर्वच प्रकारच्या तांदळामध्ये ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली आहे.
तूर निघणे सुरू झाली असली तरी तूर डाळीमध्ये एका सप्ताहात प्रति किलो २० रुपये भाव वाढ झाली आहे. उडीद डाळ १५ रुपये, मुंग डाळ प्रतिकिलो तीन रुपये, शेंगदाणा ४० रुपये प्रतिकिलो भाववाढ झाले आहे. १२० रुपये किलो असणारा शेंगदाणा १६० रुपये किलो विकल्या जात आहे.
साबुदाणामध्ये पाच रुपये किलो भाववाढ झाली आहे. मिरची पावडर किलोमागे ३० रुपये, हळद २० रुपये, धनिया पावडर २०, सुपारी प्रति किलो ५० रुपये भाववाढ झाली आहे. नारळ ४०० रुपये पोत्यामागे भात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय अस्थिरता
यावर्षी नापिकीचे वर्ष असल्याने सर्वच प्रकारचे पिकांचे उत्पादन कमी आहे. तेलाच्या किमती भडकण्यामागे आंतरराष्ट्रीय अस्थिरता आहे. या किमती अजूनही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
