सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे बेदाण्याचे सौदे मोठ्या उत्साहात पार पडले. गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या लिलावात बेदाण्याची मोठी आवक पाहायला मिळाली.
दिवसभरात ७ कोटी २९ लाख ९४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रति किलो किमान १६०, तर कमाल दर ४६१ रुपये मिळाला.
सोलापूरची श्री सिद्धेश्वर बाजार समिती ही दक्षिण महाराष्ट्रातील बेदाणा व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानली जाते. दर गुरुवारी बेदाण्याचा लिलाव होतो.
सांगली आणि विजापूरनंतर सोलापूरच्या बेदाण्याला देशभरात मोठी मागणी असते. सध्याच्या (एप्रिल महिना) वाढत्या उन्हामुळे बेदाणा तयार होण्याच्या प्रक्रियेत वेग आला आहे, ज्यामुळे आवक वाढली आहे.
चांगला भाव मिळत असल्याने सोलापुरात बेदाणा सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. मार्च एप्रिलमध्ये नवीन बेदाण्याची आवक सुरू होते.
सांगली, तासगाव, विजयपूर, बिदर आणि कलबुर्गी येथील व्यापारी सोलापूरच्या बाजारात माल विकत घेण्यासाठी सक्रिय असतात.
२४३ टन बेदाण्याची विक्री◼️ आजच्या बाजारभावाचा विचार करता, बेदाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला.◼️ बाजार समितीतील आकडेवारीनुसार एकूण आवक : ३८७ टन (२,५८,१६६ बॉक्स) बेदाणा विक्रीसाठी आला होता.◼️ त्यातील २४३ टन (१,६२,२११ बॉक्स) बेदाण्याची यशस्वी विक्री झाली आहे.◼️ १४४ टन (९५,९५५ बॉक्स) बेदाणा अद्याप शिल्लक असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
शेतकऱ्याला मिळाला उच्चांकी दर◼️ गुरूवार २ एप्रिल रोजी झालेल्या सौद्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिर्पनहळ्ळी येथील शेतकरी लक्ष्मण उद्धव पौळ यांच्या बेदाण्याला ४६१ रुपये असा उच्चांकी कमाल दर मिळाला.◼️ बसवराज श्रीशैल अंबारे या आडतदारांकडून राम माळी यांनी बेदाण्याची खरेदी केली. सोलापूर बाजार समितीत बेदाण्याची आवक आणि उलाढाल वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बाजारभाव प्रति किलो असे◼️ किमान दर : १६० रुपये◼️ कमाल दर : ४६१ रुपये◼️ सर्वसाधारण दर : ३०० रुपये
जास्त सूर्यप्रकाश न लागलेला, मऊ आणि सोनेरी रंगाचा बेदाणा उच्च दर्जाचा मानला जातो. बेदाण्याचा आणखीन भाव वाढण्याची शक्यता आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बेदाणा सोलापूरच्या बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. यंदा उत्पादन कमी असल्याने सुरुवातीपासून दर वाढलेलाच आहे. - दिलीप माने, सभापती, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती
अधिक वाचा: जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार