शेषराव वायाळ
मागील महिन्यात वाढलेले फुलांचे भाव आता गडगडले आहेत. त्यातच यंदा फुलशेतीच्या लागवडीत १५ टक्के वाढ झाल्याने भविष्यात भाव वाढतील की नाही, याची फूल उत्पादक शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे.
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलशेती वाढत आहे. या फुलांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह परप्रांतातही मागणी आहे. मात्र, दराच्या चढ-उतारामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतकरी अनेक वर्षांपासून फुलशेती करतात. त्यातच आता मुबलक प्रमाणात पाणी असल्याने फुलांची अधिक लागवड होत आहे. तालुक्यातील परतूर, वलखेड, बामणी, आनंदवाडी, सालगाव, चिंचोली, वरफळवाडी, उस्मानपूर, सातोना आदी गावांत विविध जातींच्या फुलांची लागवड केली जात आहे.
शेतकरी नगदी पीक म्हणून फुलशेतीकडे पाहतात. मात्र, भावातील चढ-उतार, मजुरांच्या अडचणीमुळे फुलशेती धोक्यात आली आहे. यंदा पाणी मुबलक असल्याने उत्पादनात वाढ होण्याबरोबरच लागवडही वाढत आहे. मात्र, भाव गडगडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. १५ % फुलशेतीच्या लागवडीमध्ये यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे कल कमी झाला होता.
पौष महिन्याचा परिणाम
सध्या फुलांची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. पौष महिना असल्याने लग्न समारंभ व इतर कार्यक्रमही बंद आहेत. परिणामी, फुलांची मागणी घटली आहे. त्यामुळे उत्पादकांबरोबरच विक्रेतेही अडचणीत आले आहेत. भाव नसल्याने तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
नवीन फुलांची लागवड
परतूर तालुक्यातील चिंचोली शिवारात फूल तोडणीबरोबरच नवीन फुलांची लागवड करण्यात आली आहे.
लग्नसराईत भाव वाढणार
सध्या लग्न समारंभासह इतर कार्यक्रम होत नसल्याने विविध प्रकारच्या फुलांना मागणी कमी झाली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात फुलांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लग्न सोहळे सुरू झाल्यानंतर फुलांना मागणी वाढेल हे मात्र नक्की आहे. सध्या मागणी होत नसल्याने भाव घटले आहे.
सध्या बाजार पेठेतील फुलांचे दर किलोमध्ये
काकडा | ३०० रुपये |
निशिगंधा | १५० रुपये |
शेवंती | १०० रुपये |
बिजली | ४० रुपये |
गलांडा | ४० रुपये |
गुलाब | ८० रुपये |
झेंडू | ५० रुपये |
मेहनत करून भाव मिळेना
शेतामध्ये अहोरात्र मेहनत करूनही फुलांना भाव मिळत नसल्याने फुलशेती अडचणीत आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने फुलशेतीसाठी अनुदान द्यावे. - दिनकर वटाणे, फूल उत्पादक शेतकरी
व्यवसाय अडचणीत
सध्या पौष महिना असून, लग्न समारंभासह इतर कार्यक्रम सुरू नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांची मागणी घटली असून, भावही कमी झाले आहेत. त्यामुळे फूल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. - अशोक काळे, फूल विक्रेता