महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी रताळ्यांना मागणी वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मार्केटसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
या वर्षी महाशिवरात्री रविवारी (दि. १५) असल्यामुळे खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या बाजारात सुमारे पाच हजार पोती रताळ्यांची आवक झाली आहे आणि दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. या रताळ्यांना प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळतो.
पंढरपूर भागातील रताळी २० ते २५ रुपये किलोने विकली जात आहेत. कर्नाटकातील बेळगाव भागातून नगण्य प्रमाणात आवक असून, त्या रताळ्यांना २० ते २२ रुपये दर मिळतो.
किरकोळ बाजारात मात्र रताळ्यांची विक्री ५० ते ६०, तर काही ठिकाणी ६० ते ८० रुपये किलो दराने होत आहे.
कराड भागातील रताळी लालसर, चवीला गोड, आकाराने लहान व आकर्षक असल्यामुळे ग्राहकांकडून त्यांना विशेष पसंती मिळत आहे.
पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले
◼️ या वर्षी पाण्याची उपलब्धता व पोषक वातावरणामुळे रताळ्याचे उत्पादन चांगले झाले आहे.
◼️ दर समाधानकारक मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
◼️ दरम्यान, शिवरात्रीनिमित्त उपवासात वापरल्या जाणाऱ्या कवठाचीही पुरंदर, नगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
◼️ किरकोळ बाजारात ५० रुपयांना तीन कवठे मिळत असून उपवास साहित्याची आणि फळांची रेलचेल आहे.
◼️ घाऊक बाजारात सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर भागांतून गावरान रताळी दाखल होतात.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना थकीत एफआरपीचे पैसे व्याजासहीत मिळणार; कारखान्यांवर कारवाईचा शासन निर्णय जारी
