ग्रामीण भागात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यल्प दर मिळत असल्यामुळे केळी लागवडीखालील क्षेत्र घटत आहे. केळी उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत राष्ट्रीय केळी महासंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी व्यक्त केले.
जालना जिल्ह्याच्या तळणी (ता. मंठा) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने, डॉ. हनुमंत चिकने उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, केळी विक्रीसाठी मध्य प्रदेशमधील बुन्हानपूर हे प्रमुख मार्केट असून, त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर व जळगाव ही महत्त्वाची बाजारपेठे आहेत.
केळी उत्पादकांना किमान १८.५०, तर कमाल २४.३० रुपये प्रति किलो दराने हमीभाव मिळावा, यासाठी संघटना स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तळणी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडताना सांगितले की, सध्या केळीला केवळ ५०० ते ७०० रुपये प्रति टन इतकाच दर मिळत असून, उत्पादन खर्चही वसूल होत नाही.
त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावेळी कानडी येथील केळी उत्पादक नानासाहेब खंदारे, राजेश खंदारे, कृष्णा खंदारे, तळणी येथील बाळू खरात, दारासिंग चंदेल यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. केळी उत्पादकांना योग्य दर मिळावा व शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
