आटपाडी : आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात रविवारी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि फटाक्यांचा आवाज घुमला.
विक्रमी दराने डाळिंब विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील वाढती मागणी, दर्जेदार मालाची आवक आणि पारदर्शक सौदे यामुळे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
सध्या दररोज ४ ते ५ हजार क्रेट डाळिंबाची आवक होत आहे. आटपाडीसह सांगोला, अकलूज, नातेपुते, माळशिरस, दौड, इंदापूर, अहमदनगर, अक्कलकोट तसेच कर्नाटकातील विजापूर आणि बेळगाव परिसरातून दर्जेदार माल थेट सौदे बाजारात दाखल होत आहे.
रविवारच्या सौद्यांमध्ये रवींद्र गायकवाड, गुरसाळे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो ७२, १०२, १६४, ३११ रुपये दर मिळाला. पिलीवचे रामचंद्र भैस यांच्या मालाला ९१, ११०, १७१, २५१ रुपये मिळाले.
विठ्ठल फडतरे, भगतवाडी यांच्या मालाला ८०, १००, १७०,२११ रुपये तर ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या डाळिंबाला ८०, ११०, १६१, २०० रुपये दर नोंदवला गेला. आंबा हंगाम संपल्याने आणि श्रावण महिन्यातील उपवासामुळे डाळिंबाची मागणी वाढली आहे.
आधुनिक सुखसोयी, पारदर्शक कारभार आणि देशभरातील बाजारपेठेत आटपाडीचा माल पोहोचवण्याचे प्रयत्न यामुळे बाजार तेजीत आहे. आपला माल थेट आटपाडी बाजारात आणा आणि योग्य दराचा लाभ घ्या. - संतोष पुजारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी
अधिक वाचा : PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?