यंदा कापूस उत्पादनात झालेली घट आणि बाजारातील कमी आवक, यामुळे कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे.
बाजार सावंगी परिसरात मध्यम धाग्याच्या कापसाचे दर आता ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, खासगी व्यापाऱ्यांनी शासनाच्या सीसीआय दरालाही मागे टाकले आहे.
यंदा लागवडीत झालेली घट, कापूस आयातीवरील शुल्क वाढ आणि सरकीच्या भावात झालेली वृद्धी, यामुळे कापसाच्या बाजारात तेजी दिसून येत आहे.
सुरुवातीला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांवर स्थिरावलेले दर आता थेट ८ हजार २०० रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शासनाने २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.
बाजार सावंगी परिसरात मध्यम धाग्याचा कापूस असतो. त्यामुळे सीसीआयकडून हमी दराने ७ हजार ७१० रुपये प्रति क्विंटलने कापूस खरेदी केला जात आहे.
बाजार सावंगी परिसरातील बाजारपेठेत व्यापारी हा कापसू ८ हजार १०० ते ८ हजार २०० रुपयांपर्यंतच्या दराने खरेदी करीत आहेत.
शेतकऱ्यांचा सवाल : ही दरवाढ कुणासाठी?
◼️ कापसाच्या दरात वाढ होत असली तरी, बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कापूस साठा आता संपत आला आहे.
◼️ जेव्हा शेतकऱ्यांकडे माल असतो तेव्हा भाव नसतो आणि आता माल संपत आल्यावर भाव वाढत आहेत, मग ही दरवाढ नेमकी कुणासाठी? असा संतप्त सवाल येथील शेतकरी नामदेव नलावडे यांनी उपस्थित केला आहे.
पुढील काळात ८५०० रुपयांकडे वाटचाल?
◼️ बाजारातील सध्याची स्थिती पाहता, येत्या काळात मध्यम धाग्याच्या कापसाचे भाव ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
◼️ ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस साठा शिल्लक आहे, त्यांचे डोळे आता पुढील दरवाढीकडे लागले आहेत.
अधिक वाचा: ३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?
