यवतमाळ : केंद्र शासनाने कापसाचे हमी दर(Guaranteed price) जाहीर केले. मात्र त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला(Cotton) आला आहे. सीसीआयकडून(CCI) मिळणारा दर पडवणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे.
आतापर्यंत १३ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अजूनही निम्मा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा आहे. तर अर्ध्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे. यात शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढला आहे.
जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. हा कापूस विक्रीकरिता आला आहे. मात्र याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहे. ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे. तर सीसीआय ७ हजार ५२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे. मिळणारे दर परवडणारे नाही.
यातून शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या प्रतीक्षेत कापूस विक्री थांबविली आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हा कापूस मिळेल त्या दरात विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
यातून आतापर्यंत सीसीआयने ८ लाख ८४ हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. तर अडीच लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. वणी झोनमध्ये पाच लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे.
दरवर्षी जिल्ह्यात ३० ते ४० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. आतापर्यंत १३ लाख क्विंटल कापूसच बाजारात आला आहे. उत्पादनात घट नोंदविल्या नंतरही २५ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कापसाची गर्दी वाढणार
* कर्जाची परतफेड आणि संपूर्ण वर्षभराचे नियोजन करण्यासाठी शेतकरी दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात कापसाची विक्री करतात.
* एकाचवेळी सर्व कापूस विकण्याच्या मानसिकतेत शेतकरी असतात. दर वाढले तर शेतकऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकवेळा कापूस संपल्यानंतर दर वाढतात.
* यातून अलिकडे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीचे प्रमाण वाढले आहे. याचवेळी हा कापूस बाजारात येण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : राज्यात १२१ पैकी ११८ कापूस खरेदी केंद्रे सुरू