युनूस नदाफ
नादेड जिल्ह्याच्या पार्टी (ता. अर्धापूर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी केळी काढण्यापूर्वी व्यापाऱ्यांना इसार पैसे घेऊन माल देण्याचा सौदा देखील केला होता.
अनेकांनी केळीच्या भरवशावर मुलाबाळांचे शिक्षण आणि विवाहाचे देखील नियोजन लावून ठेवले होते. मात्र, काढणीला आलेल्या पिकांचेच अतोनात नुकसान झाले. त्यासोबतच बाजारातही कच्च्या केळीचे दर अचानक कोसळल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
अर्धापूर तालुक्यातील केळी खाण्यास चविष्ट आणि टिकाऊ असल्याने परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यामुळे येथील केळीला चांगला दर असतो. मात्र, वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने केळीच्या दरातही कमालीची घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी देशांतर्गत जाणाऱ्या केळीला २२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. तर परदेशात निर्यात होणाऱ्या केळीला २४०० ते २५०० रुपये दर होता.
मात्र एका दिवसांत दरात मोठी घसरण झालेली दिसत आहे. देशांतर्गत निर्यात होणाऱ्या मालात ९०० रुपयांनी तर परदेशात जाणाऱ्या केळीमध्ये ११०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला आहे.
दाभड, मालेगाव व अर्धापूर तीन मंडळात हजारो हेक्टरवर केळीची लागवड झालेली आहे. काही भागातील केळीला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला नसताना सुद्धा आता दरात घट झाल्याने आता त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती