नवी मुंबई : कडक उन्हामुळे मुंबई, नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेयांसह कलिंगडला पसंती दिली जात आहे.
६ दिवसांत मुंबई बाजार समितीमध्ये ३,६०८ टन कलिंगडची विक्री झाली आहे. रमजानमुळेही ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
फळांच्या मार्केटमध्ये कलिंगडचे राज्य सुरू झाले आहे. ३ मार्चला एकाच दिवशी सर्वाधिक ७९१ टन आवक झाली होती. शुक्रवारी ७७० तर शनिवारी ३५१ टनआवक झाली आहे.
सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे.
बाजार समितीमध्ये ९ ते १५ रुपये किलो दराने कलिंगडची विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्ये २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
विदेशातूनही मागणी
महाराष्ट्रातील कलिंगडला विदेशातूनही मागणी वाढत आहे. आखाती देशांसह विविध ठिकाणी कलिंगडची निर्यात होत आहे. राज्याच्या विविध भागांतून थेट निर्यात केली जात आहे.
बाजार समितीमधील आवक टनमध्ये
३ मार्च - ७९१
४ मार्च - ६१८
५ मार्च - ६१०
६ मार्च - ४६८
७ मार्च - ७७०
८ मार्च - ३५१
रमजानचे उपवास सुरू झाल्यामुळेही फळांची वाढली मागणी
• मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाल्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली.
• उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी कलिंगडलाही प्राधान्य दिले जात आहे. रमजानचे उपवास सुरू झाल्यामुळेही या फळाला मागणी वाढली आहे.
• मेअखेरपर्यंत कलिंगडची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची आवक होत आहे. तापमान वाढले असल्यामुळे ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - संभाजी झांबरे, व्यापारी, एपीएमसी
अधिक वाचा: वाशी मार्केटमध्ये हापूससह बदामी लालबाग, तोतापुरीही दाखल; कोणत्या आंब्याला मिळतोय किती दर?