आज-उद्या भाववाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. परंतु, भाववाढीची प्रतीक्षा संपत नसून, मागील चार दिवसांत भावात आणखी घसरण झाल्याचे हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात पाहायला मिळत आहे. परिणामी, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
गतवर्षी तुरीने ११ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. यंदाही तुरीला समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सरासरी सात हजार रुपयांवर भाव गेला नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाववाढीची आशा असताना मागील तीन महिन्यांपासून समाधानकारक भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आज उद्या भाव वाढेल, या आशेवर तूर विक्री केली नाही. आता पेरणी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांकडून बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. बी-बियाणे खरेदीसाठी पैसा लागणार असल्याने ज्या शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नव्हती, ते आता तूर विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, हंगामापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने फटका बसत आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तुरीला सरासरी सात हजारांचा भाव मिळाला. परंतु, आवक कमी झाल्यानंतर भाव वाढतील, अशी आशा होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तूर शिल्लक ठेवली. परंतु, सद्य:स्थितीत तुरीचे भाव सरासरी सात हजारांखाली आले आहेत. जवळपास तीन महिने तूर विक्रीविना ठेवून भाव समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.
मोंढ्यात तुरीची आवक वाढली
पेरणीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शेतकरी बी-बियाणे खरेदीकरिता तूर विक्री करीत आहे. हाती आलेल्या पैशातून बी-बियाणांची खरेदी करावी लागणार असल्याने ज्या काही शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक होती. ते आता विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आठवडाभरापासून मोंढ्यात तुरीची आवक वाढली आहे.
भुईमूगाला सरासरी साडेपाच हजारांचा भाव
मागील आठवडाभरापासून मोंढ्यात उन्हाळी भुईमूग शेंगा विक्रीसाठी येत आहेत. सध्या किमान ५ हजार ते कमाल ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे, तर सरासरी ५ हजार ४०० रुपयांनी शेंगांची विक्री होत आहे, तर आवक ७०० ते ८०० क्विंटलची होत आहे.
मोंढ्यातील तुरीची आवक
दिनांक | आवक (क्विं. मध्ये) | सरासरी भाव |
१० मे २०२५ | १६१ | ७००० |
१३ मे २०२५ | १९५ | ७००० |
१५ मे २०२५ | ३२० | ६८२५ |
१७ मे २०२५ | ५०० | ६७३० |
हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा