शेती करताना येणाऱ्या अडचणी, पिकांवरील रोग, खतांची योग्य मात्रा किंवा बाजारभावाची माहिती या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही.
केंद्र शासनाच्या किसान कॉल सेंटर योजनेमुळे तज्ज्ञांचा सल्ला थेट फोनवर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांच्या स्थानिक भाषेत तत्काळ मार्गदर्शन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
किसान कॉल सेंटर योजना काय?
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी ही योजना असून, शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती व तांत्रिक मार्गदर्शन फोनद्वारे दिले जाते.
स्थानिक भाषेतही माहिती?
कृषी विभागाच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, म्हणूनच शासनाने त्यांच्या प्रादेशिक व स्थानिक भाषेत सल्ला देण्यासाठी किसान कॉल सेंटरची सुविधा सुरू केली आहे
सेवा कोणत्या वेळेत उपलब्ध?
शेतकऱ्यांना किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत, आठवड्यातील सर्व दिवस माहिती मिळणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश?
किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या स्थानिक भाषेत तत्काळ आणि योग्य माहिती व सल्ला देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित उपाय देणे, उत्पादन वाढवणे व शेती अधिक शाश्वत बनवणे.
कोणत्या विषयांवर मिळते मार्गदर्शन?
पीक लागवड, कीड-रोग व्यवस्थापन, खत व औषधांचा वापर, हवामान, मृदा आरोग्य, पशुसंवर्धन व कृषी योजनांची माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तत्काळ माहिती उपलब्ध होईल.
उत्पन्न वाढण्यास मदत
किसान कॉल सेंटर ही योजना शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शक ठरत असून, योग्य वेळी मिळणारा सल्ला शेतीतील नुकसान टाळण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मोलाचा ठरत आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपर्क क्रमांक कोणता?
शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक १८००१८०१५५१ यावर माहिती मिळणार आहे.
अधिक वाचा: ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार
