भीमगोंडा देसाई
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) लागू करण्यात येणाऱ्या नवीन वीज दर पत्रकात मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजनेतील लाभार्थ्यांनाही बिलाची आकारणी केली आहे. वीज शुल्क, स्थिर आणि वहन शुल्क आकारणी निश्चित केली आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २५ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुधारित दर पत्रकानुसार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांना वीज बिल येणार की शासन भरणार यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.
मात्र जेव्हा यासंबंधी स्थानिक वीज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दर पत्रकात बिलाची आकारणी केली तर पात्र कृषी पंपधारकांना बिल भरावे लागणार नाही, असे स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षीच्या म्हणजे २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजने'ची घोषणा केली.
योजनेत पात्र असलेल्या साडे सात अश्वशक्तीपर्यंतच्या पात्र कृषी पंपधारकांना तीन महिन्यांचे वीज बिल शून्य आले. विधानसभा निवडणुकीआधी शून्य बिल असलेल्या ग्राहकांना निवडणूक झाल्यानंतर पोकळ थकबाकीसह बिले आली. अनेक शेतकऱ्यांना पन्नास हजार ते लाखांपर्यंत बिल आले.
आता महावितरणकडून सुधारित दरपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये १ जुलै २०२५ ते २०२६ पर्यंत स्थिर आकार १५० रुपये, प्रति युनिट ५.८४ वीज शुल्क, १.४७ वहन शुल्क असे एकूण प्रति युनिट ७ रुपये ३१ पैशांची आकारणी करण्यात येणार असल्याचे दरपत्रकात म्हटले आहे.
महावितरणच्या नवीन वीज दर पत्रकात मोफत वीज योजनेतील कृषी पंपधारकांना वीज बिलाची आकारणी करण्याची गरज नव्हती. महावितरण वीज गळती, चोरीतून भ्रष्टाचार करून शासनाकडून अशाप्रकारे पैसे वसूल करीत आहे. म्हणून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कोणत्याही कृषी पंपधारकांनी वीज बिल भरू नये. - विक्रांत पाटील, अध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन.
दोन जिल्ह्यातील लाभार्थी ग्राहक
(७.५ अश्वशक्तीच्या कृषी पंपधारकांची विभागनिहाय संख्या)
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर ग्रामीण एक - ३४२४७
कोल्हापूर ग्रामीण दोन - ३२७२५
जयसिंगपूर - ३१६७५
गडहिंग्लज - २५३९९
इचलकरंजी - ६१६३
कोल्हापूर शहर - १०५८
सांगली विभाग
कवठेमहंकाळ - ७९४६०
विटा - ६८८५०
सांगली ग्रामीण - ५५१९९
इस्लामपूर - ४२२१४
सांगली शहर - १७३५