कांदा व लसूण पिकांवर सामान्यतः रुंद पानांचे आणि गवताळ तण मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात. यात प्रामुख्याने काँग्रेस गवत, हरळी, लव्हाळा, वाघनखी, शिप्पी, चिमणचारा, लोणे आणि कुंदा या तणांचा समावेश होतो. सध्या शेतकऱ्यांना काँग्रेस गवत आणि लव्हाळा या तणांची समस्या जास्त भेडसावते. कांदा व लसूण पिकांची सुरुवातीची वाढ हळवी असते, जास्त उंची नसते, मुळांची लांबी कमी असते आणि वारंवार सिंचन व खतांचा वापर होत असतो.
त्यामुळे, कांदा आणि लसूण पिकं इतर बहुतेक पिकांपेक्षा तणांच्या स्पर्धेसाठी जास्त संवेदनशील ठरतात. प्रभावी तण नियंत्रणाच्या अभावामुळे कांद्याची उत्पादकता ४०-८०% पर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे, उत्पादन वाढवण्यासाठी, योग्य वेळेवर तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पिकांमध्ये तण नियंत्रणाचे अत्यंत महत्त्वाचे चरण लागवडीच्या पहिल्या ४ ते ६ आठवड्यांमध्ये असतात.
या कालावधीत पिकं अजूनही मुळांची स्थापना करत असतात आणि तणांच्या स्पर्धेचा सामना करण्यास सक्षम नसतात. तण पिकांसोबत पाणी, पोषक तत्त्व आणि सूर्यप्रकाश यांसारख्या आवश्यक संसाधनांसाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन कमी होऊ शकते. यामुळे पहिल्या ३०-४५ दिवसात तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कालावधीत तण नियंत्रण राखल्याने कांदा आणि लसूण पिकांना मजबूत आणि निरोगी वाढ होण्यास मदत होते, ज्यामुळे अंतिम उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते.
कांदा व लसूण पिकांतील तण नियंत्रणासाठी शेतकरी विविध पद्धतींचा अवलंब करू शकतात, की जे पिकांच्या विशेष गरजांनुसार योग्य ठरतात. सर्वप्रथम, पूर्वलागवडीचे तण नियंत्रण महत्वाचे आहे; यासाठी शेताची योग्य प्रकारे मशागत करा, म्हणजे शेत कोरडं आणि साफ होईल. तणांचे बीज काढून टाकण्यासाठी चांगली नांगरणी करा. मल्चिंग वापरल्याने तणांना सूर्यप्रकाश मिळत नाही, ज्यामुळे त्यांचा विकास अडवला जातो आणि पिकाला आवश्यक ती ओल ठेवली जाते.
हाताने खुरपणी केल्यास तणांचा प्रादुर्भाव प्रभावीपणे कमी करता येतो. पिकांजवळ हवा खेळती राहते व पिकांची वाढ जोमात होते. पण खुरपणी केल्यास खर्च वाढतो. तणनाशकांचा वापर देखील प्रभावी ठरतो. एकात्मिक तण व्यवस्थापन ही एक दीर्घकालीन आणि टिकाऊ पद्धत आहे, ज्यात विविध तंत्रांचा एकत्रित वापर केला जातो, जसे की पिकाची योग्य फेरपालट, मल्चिंगचा वापर, तणनाशकांचा वापर आणि खुरपणी. पाणी आणि खतांचा योग्य वापर देखील तण नियंत्रणात मदत करतो; जास्त पाणी देण्यामुळे तणांची वाढ होऊ शकते, तर योग्य खत वापरल्यास पिकाला पोषण मिळत असताना तण वाढवणारे घटक कमी होतात.
आपण पाहिले की, कांद्याच्या लागवडीमध्ये मल्चिंग तण व्यवस्थापनासाठी अत्यंत प्रभावी आहे, कारण ते सूर्यप्रकाश अडवून तणांच्या बियांची उगवण रोखते. यामुळे मातीतील ओलावा टिकवून ठेवला जातो, ज्यामुळे कांद्याची निरोगी वाढ होऊन तणांचा विकास मर्यादित होतो, कारण तणांना सामान्यतः कोरड्या परिस्थितीची आवश्यकता असते. मल्चिंग मातीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे तणांच्या वाढीस प्रतिबंध पडतो. जसे की मी पूर्वी सांगितले की सध्या शेतकऱ्यांना काँग्रेस गवत आणि लव्हाळा या तणांची समस्या जास्त भेडसावते. तर त्या साठी मल्चिंग एक प्रभावी उपाय आहे.
याव्यतिरिक्त, मल्चिंग रासायनिक तणनाशकांच्या वापराची आवश्यकता कमी करते, तण नियंत्रणासाठी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर दृष्टिकोन प्रदान करते, तसेच तणनाशक प्रतिकाराच्या धोख्याला कमी करते. ते मातीची धूप देखील रोखते, ज्यामुळे तणांच्या बियांचा प्रसार कमी होतो आणि मातीचे आरोग्य राखले जाते. एकूणच, मल्चिंग तण नियंत्रण सुधारते आणि कांद्याच्या पिकाच्या एकूण आरोग्याला प्रोत्साहन देते.
तण व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर देखील प्रभावी ठरतो. भारत सरकारच्या कृषी विभागानुसार, केंद्रीय कीटनाशक बोर्ड आणि नोंदणी समितीच्या अंतर्गत कांदा आणि लसूणसाठी सुमारे १० निवडक तणनाशकांची नोंदणी केली आहे. त्या पैकी उगवण पूर्व तणनाशकांत ऑक्सिफ्लुरोफेन @ २३.५% किंवा ऑक्सिफ्लुरोफेन २० % आणि पेंडीमेथालिन ३८.७% या दोन तणनाशकांचा समावेश आहे. काही शेतकरी उगवण पूर्व तणनाशकांत प्रेटीलाक्लोर ५० % पण वापरतात पण याची कांदा व लसूण पिकासाठी अधिकृत नोंदणी झालेली नाही. तसेच उगवणी नंतरचे तणनाशकांत क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल १२.२५ %, फेनोक्साप्रॉप-पी-इथाइल ९.३%, फ्लोरोक्सीपायर-मेप्टिल ४८%, प्रोपॅक्विझाफॉप १०% ईसी, क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी, प्रोपॅक्विझाफॉप ५ % + ऑक्सिफ्लुरोफेन १२ % डब्ल्यू /डब्ल्यू ईसी, क्विझालोफॉप इथाइल ४ % + ऑक्सिफ्लुरोफेन ६ % ईसी, क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल १२.२५ % + ऑक्सिफ्लुरोफेन १४.७ % ईसी या आठ तणनाशकांचा समावेश आहे. या तणनाशकांचा योग्य आणि सुरक्षित वापर करून तण नियंत्रण करता येते, ज्यामुळे कांदा आणि लसूण पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. तण नाशकांचा वापर योग्य प्रमाणात करण्यासाठी तुम्ही जे केमिकल घेत आहत त्या बॉटल वरील माहिती नीट वाचा. खालील डोस २००-२५० लिटर पाण्यासाठी वापर करा.
उगवण पूर्व तणनाशकांत
१. ऑक्सिफ्लुरोफेन २३.५% ईसी – २५० मिली (१ मिली/ली)
२. पेंडीमेथालिन ३८.७% सी एस – ७५० मिली (३ मिली/ली)
३. प्रेटीलाक्लोर – ६००-७०० मिली (२.५ - ३ मिली/ली)
उगवणी नंतरचे तणनाशकांत
१. क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल १२.२५ % - १६०-२०० ग्रॅ. (०.८ ग्रॅ. / ली)
२. फेनोक्साप्रॉप-पी-इथाइल ९.३% ईसी – ५००मिली (२ मिली/ली)
३. फ्लोरोक्सीपायर-मेप्टिल ४८% डब्ल्यू/वी ईसी – ३७५मिली (१.५मिली/ली)
४. प्रोपॅक्विझाफॉप १०% ईसी – ३०० - ३२५मिली (१.२५-१.५ मिली/ली)
५. क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी – ५००मिली (२ मिली/ली)
६. प्रोपॅक्विझाफॉप ५ % + ऑक्सिफ्लुरोफेन १२% डब्ल्यू/डब्ल्यू ईसी – ४५०-५००मिली (२ मिली/ली)
७. क्विझालोफॉप इथाइल ४ % + ऑक्सिफ्लुरोफेन ६% ईसी – ५००-६००मिली (२ मिली/ली)
८. क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल १२.२५ % + ऑक्सिफ्लुरोफेन १४.७ % ईसी –५००मिली (२ मिली/ली)
पुणे येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयद्वारे कांदा आणि लसूणसाठी तण व्यवस्थापनाच्या काही शिफारसी देण्यात आल्या आहेत.
१. नर्सरी स्टेज: बी पेरणी नंतर पाणी दिल्यावर २४-४८ तासाच्या आत ऑक्सिफ्लुरोफेन @ २३.५% ईसी (१ मिली/ली) किंवा पेंडीमेथालिन @ ३०% ईसी (२ मिली/ली) ची फवारणी घेता येते.
२. कांदा उत्पादनासाठी: प्रभावी तण नियंत्रणासाठी, कांदा पुनर्लागवडीपूर्वी (२४-४८ तासाच्या आत) किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्सिफ्लुरोफेन @ २३.५% ईसी (१.५ -२.० मिली/ली) / पेंडीमेथालिन @ ३०% ईसी (३.५-४ मिली/ली) वापरण्याची शिफारस केली जाते आणि त्यानंतर लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करण्याची शिफारस केली जाते.
भारतात कांदा उत्पादक शेतकरी बहुतांश वेळा पुनर्लागवडीनंतर सुमारे २१ दिवसांनी तण नियंत्रणासाठी उगवणीनंतरच्या तणनाशकांवर अवलंबून असतात. मात्र, पुनर्लागवडीपूर्वी ओल्या बेडवर २४–४८ तासांमध्ये उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करण्याची शिफारस अत्यंत प्रभावी ठरते. या पद्धतीमुळे तणांची सुरुवातीची वाढ मोठ्या प्रमाणात आटोक्यात येते, ज्यामुळे पीकाच्या प्रारंभिक आणि संवेदनशील अवस्थेत तणांशी होणारी स्पर्धा कमी होते. उगवणीनंतरची फवारणी नंतर तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार केली जाऊ शकते.
तणनाशके वापरताना खालील प्रकारे योग्य ती खबरदारी जरूर घ्यावी.
- कांदा-लसूण साठी नोंदणीकृत असलेलेच तणनाशकांची फवारणी करा. या व्यतिरिक्त इतर तणनाशकांची फवारणी केल्यास पिकास झटका बसतो. आधी शिफारस केल्याप्रमाणेच तणनाशके निवडा.
- तणनाशकांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सिलिकॉन आधारित स्टिकर ०.५ मिली /ली ह्या प्रमाणात वापरावा.
- तणनाशक फवारण्यापूर्वी शेतात योग्य प्रमाणात पाणी द्या. तणनाशके वापरल्यानंतर जमिनीवर चालू नका. त्यामुळे तणनाशकांचा आच्छादन तुटेल आणि त्याचा परिणाम कमी होईल.
- तणनाशकाची विषारीपण कमी करण्यासाठी फवारणी करताना चिलेटेड झिंक १ मिली/ली ह्या प्रमाणात वापरण्याचा आग्रह धरावा
- तणनाशक खरेदी करताना, नेहमी वैध परवाने असलेल्या नोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी करा.
- खरेदी करताना वैध तारीख तपासा, आणि योग्य पॅकेजिंग सुनिश्चित करा.
- तणनाशक घरापासून दूर, त्यांच्या कंटेनरमध्ये, इतर रसायनांपासून वेगळे आणि मुलं आणि प्राण्यांपासून दूर ठेवा.
- गळती होणारे किंवा उघडे कंटेनर मध्ये तणनाशके ठेवू नका आणि त्यांना सूर्यप्रकाश किंवा पावसापासून दूर ठेवा.
- तणनाशके फवारताना मास्क आणि संरक्षण किट घाला. शरीराच्या कोणत्याही भागात तणनाशके जाऊ नयेत याची काळजी घ्यावी.
- तणनाशके द्रावण स्वच्छ पाण्याने तयार करा, लेबलवरील सूचनांचे पालन करा आणि योग्य डोस वापरा.
- योग्य उपकरणे निवडा, फवारणीसाठी वेगवेगळे उपकरणे वापरा आणि उपकरणांची स्थिती तपासा.
- तणनाशके योग्य हवामानात लावा, ओव्हरडोस टाळा आणि वापरल्यानंतर उपकरणे स्वच्छ करा. अखेर, उर्वरित द्रावण सुरक्षितपणे नष्ट करा,
- रिकाम्या बॉटल ला पाण्याच्या स्रोतांपासून दूर मातीमध्ये गाडा आणि जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छपणे धुवा.
- अशाप्रकारे कांदा व लसूण या पिकांमध्ये आपण तण व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून पिकांची गुणवत्ता व उत्पन्न सुधारू शकतो.
- डॉ. संकेत मोरे, भाग्यश्री कावले
संपर्क : डॉ. संकेत मोरे, शास्त्रज्ञ, भा.कृ.अनु.प.-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे
संपर्क: 96012 66636