मुंबई : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यात वीज पडून एका तरुणाचा तर नाशिकमध्ये झाड अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. बीड शहरातील पोलिस पेट्रोलपंपाचे छत कोसळल्याने दोघे जखमी झाले.
वीज पडल्याने भाटेपुरी (ता.जालना) येथील विठ्ठल गंगाधर कावळे (२४) या युवकाचा मृत्यू झाला. बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला.
धाराशिव जिल्ह्यात भूम शहर व परिसरात काही ठिकाणी गारा पडल्या. उमरगा तालुक्यात येणेगूर येथे प्रवासी ऑटोवर वादळी वाऱ्यात वीजवाहिनी कोसळली. यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोरडगाव येथील आसना नदीला पूर आला.
नाशिकमध्येही सलग दुसऱ्या दिवशी तासभर मुसळधार पाऊस झाला. झाड दुचाकीवर कोसळल्याने गौरव भास्कर रिपोटे (२१, रा. देवळाली गाव) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर शहरातही सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पुढील दोन दिवस पावसाचेराज्यात पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा: केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर