Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:21 IST

Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे.

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, भू-स्थानिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) व इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे.

या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे.

या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता व अ‍ॅग्रीटेक नाविन्यता केंद्र (Artificial Intelligence & AgriTech Innovation Centre - AIAIC) स्थापन केलेले आहे.

या केंद्रामार्फत राज्यस्तरीय धोरणात्मक समन्वय, तांत्रिक मानके, नाविन्यता कार्यक्रम, स्टार्टअप ऑनबोर्डिंग, तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांशी सहकार्य विकसित करण्यात येणार आहे.

सदर संस्थेच्या कार्यास विभागीय स्तरावर पाठबळ देण्यासाठी तसेच, कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन व विस्तार कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास चालना दिली जाणार आहे. 

त्यादृष्टीने राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता व इनक्युबेशन केंद्र (Artificial Intelligence Innovation & Incubation Centre-AIC) स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे.

त्यानुषंगाने चार कृषी विद्यापीठांकडून AIC स्थापन करण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार चार कृषी विद्यापीठांकडून प्राप्त प्रस्ताव मान्य करून सदर विद्यापीठांमध्ये AIC स्थापन करण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये संस्थात्मक स्तरावर एआय संशोधन, नाविन्यता व इनक्युबेशन पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देश आहे.

खालील चार राज्य कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता व इनक्युबेशन केंद्रे (AIC) स्थापन करण्यास शासन यामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर AIC केंद्र AIAIC ची प्रादेशिक केंद्रे म्हणून कार्य करतील.

सदर केंद्र कोणती?१) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर.२) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.३) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.४) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.

अधिक वाचा: कर्जमाफी नक्की कशाच्या आधारावर दिली जाणार; शेतकऱ्यांची कोणकोणती माहिती घेतली जाणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Establish Agri-AI Centers in Four Agricultural Universities

Web Summary : Maharashtra will establish Agri-AI centers in four agricultural universities to promote AI use in farming. This initiative, under the MahaAgri-AI policy, aims to boost research, innovation, and technology adoption in agriculture, fostering growth in the sector.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशेतकरीमहाराष्ट्रशासन निर्णयसरकारराज्य सरकारविद्यापीठराहुरीअहिल्यानगरकोकणवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठअकोलारत्नागिरी