वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो.
परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसानी टाळावी, तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा.
यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. यामुळे सिंचन करताना शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे.
रोहित्रांवरील भार होतो कमी
१) कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे.
२) कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते.
३) योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत, आदी फायदे होतात.
४) पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते.
५) तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांनी कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचे प्रमाणही कमी होते.
६) यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल.
कॅपॅसिटरची गरज का?
१) प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे.
२) कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
३) मात्र, बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद, तर काहींनी थेट जोडणी केली आहे.
४) त्यामुळे ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत, त्यांनी ते बसवून घ्यावेत कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास दुरुस्त करून घ्यावेत.
अधिक वाचा: Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात