Join us

वादळामुळे आठ एकरांवरील डाळिंबाची बाग झाली उद्ध्वस्त अन् क्षणात मुलाला डॉक्टर करायचे स्वप्नही भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:44 IST

मोठी मेहनत करून लावलेली डाळिंबाची बाग कर्ज काढून, उसनवारी करून घरातील सोने मोडून जोपासली. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी एक कोटी रुपये होतील अन् यातून मुलाला एमबीबीएस डॉक्टर करू अशी इच्छा बाळगणारे अर्जुन कासार यांचे स्वप्न वादळाने उद्ध्वस्त केले.

नितीन कांबळे 

अकरा वर्षांपूर्वी मोठी मेहनत करून लावलेली डाळिंबाची बाग कर्ज काढून, उसनवारी करून घरातील सोने मोडून जोपासली. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी आठ एकरमध्ये एक कोटी रुपये होतील अन् यातून मुलाला एमबीबीएस डॉक्टर करू, अशी इच्छा बाळगणारे वटनवाडी येथील अर्जुन कासार यांचे स्वप्न बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळाने उद्ध्वस्त केले.

तोडणीस आलेली त्यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त झाली अन् क्षणात मुलाला डॉक्टर करायचे व कर्ज फेडायचे स्वप्न अक्षरशः हवेत उडून गेले. बीड जिल्ह्याच्या वटनवाडी (ता. आष्टी) येथील अर्जुन कासार यांनी २०१४ साली आठ एकरातील फळबागेत ३,००० झाडे कष्टाने जोपासली.

२५ लाख रुपये खर्च करून पाच किलोमीटर अंतरावरून चोभा निमगाव तलावातून पाइपलाइन आणली. एक एकरचा शेततलाव अन् ठिबक सिंचन केले. २०१८ मध्ये फळ आले त्यावेळी दुष्काळाने दगाफटका केला. सलग तीन वर्षे दुष्काळात गेले.

गत चार-पाच वर्षापासून चांगल्या प्रकारे फळे येण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी पूर्ण डाळिंब बाग डौलाने बहरली होती. मोठ्या प्रमाणात फळे लागल्याने यावर्षी एकशे दहा टन फळे निघतील व त्यातून एक कोटी रुपये होतील, असा अंदाज होता. येत्या १५ दिवसांत डाळिंबाची विक्री होणार होती.

याच पैशांतून सध्या नीटची परीक्षा देणाऱ्या मुलाला एमबीबीएस करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु, आलेल्या वादळाने आठ एकरांवरील फळबाग उद्ध्वस्त झाली. झाडे उन्मळून पडली. या फळबागेसाठी कुटुंबाने काही वर्षापासून घेतलेली मेहनत अवघ्या अर्ध्या तासात वायाला गेली. डोळ्यादेखत झाडे उपटून पडत होती, हे पाहताना सर्व कुटुंबाला रडू कोसळत होते, अशी आपबीती अर्जुन कासार यांनी सांगितली.

 

फळबागा जोपासताना पोटच्या लेकरापेक्षाही जास्त जीव लावावा लागतो. यावर्षीच्या लग्नसराईमध्ये नातेवाइक, मित्रांच्या लग्नाला न जाता पूर्ण उन्हाळ्यात फळबागेची जोपासना केली. आता जून महिन्यामध्ये फळे विकून चार पैसे हाती येतील, असा अंदाज होता. मात्र, या भयंकर वादळाने होत्याचे नव्हते झाले. - अर्जुन कासार, शेतकरी, वटनवाडी, ता. आष्टी.

हेही वाचा : परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबीडफळेफलोत्पादनपाऊससरकारबाजारहवामान अंदाज