नानासाहेब कांदळकर
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शेतकरी श्रावण पुंजाजी श्रीनाथ यांनी वाढत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे वैतागून एक हेक्टर क्षेत्रावरील सीताफळाची फळबाग जेसीबीच्या साह्याने नष्ट केली.
चार ते पाच वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून एका नामांकित कंपनीची रोपे त्यांनी मोठ्या आशेने ही बाग फुलविली होती. चार वर्षांनंतर झाडांना फळधारणा सुरु झाली; मात्र फळांच्या आत अळीचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने ते हतबल झाले होते.
कीड व्यवस्थापनासाठी सतत फवारण्या करूनही कीड नियंत्रणात येत नव्हती. यावर आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झाला; मात्र उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, चार ते पाच वर्षापासून शेतात कोणतेही पीक घेता न आल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला.
अखेर वैतागून ८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी संपूर्ण सीताफळ बाग जेसीबीच्या साह्याने नष्ट केली. परिसरात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके असून, त्यांनाही सातत्याने किडीचा फटका बसत आहे.
बाजारभावातील घसरण, शेतकरी संकटात !
किडीचा प्रादुर्भाव, निसर्गाची अनिश्चितता व बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट करण्याची वेळ आली.
सीताफळ उत्पादक शेतकऱ्याचा प्रयत्न !
पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून श्रावण श्रीनाथ यांनी सीताफळाची बाग फुलवण्याचा प्रयत्न केला. नवीन प्रयोगातून आर्थिक स्थैर्य मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता.
उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा बोजा !
चार ते पाच वर्षात रोपे, औषधे व मजुरीवर लाखो रुपये खर्च झाले. उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा बोजा मात्र तसाच राहिला.
वाढत्या किडीचा फटका !
फळांच्या आत अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. सतत फवारणी करूनही कीड नियंत्रणात आली नाही.
