सागर कुटे
राज्यातील उन्हाळी हंगामातील पेरणीचा आढावा घेतला असता, यंदा पेरणीची गती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ मार्च २०२६ पर्यंत राज्यात एकूण २,१२,९३० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असून, हे प्रमाण मागील वर्षाच्या याच कालावधीतील पेरणीच्या (३,१४,०४० हेक्टर) तुलनेत केवळ ६८ टक्के आहे.
यांसह विशेष की, गत पाच वर्षाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत तर हे प्रमाण केवळ जेमतेम ४८ टक्के आहे.
काही जिल्ह्यांची उल्लेखनीय कामगिरी
पेरणीची एकूण गती कमी असली तरी, काही जिल्ह्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. यामध्ये सातारा १६९ टक्के (४,४८२ हेक्टर), चंद्रपूर १५१ टक्के (१२,२४६ हेक्टर), कोल्हापूर १४६ टक्के (३,५१० हेक्टर), गडचिरोली १३१ टक्के (१२,५२० हेक्टर) पेरणी झाली आहे.
विभागनिहाय तुलनात्मक स्थिती
• नागपूर विभाग : या विभागाने यंदाही आघाडी घेतली असून १,०७,४३४ हेक्टरवर पेरणी पूर्ण केली आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
• कोल्हापूर विभाग : या विभागात मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी ७,०८२ हेक्टर क्षेत्र होते, जे यंदा १०,६११ हेक्टरवर पोहोचले आहे.
• अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर : या विभागांमध्ये पेरणीची गती सर्वात कमी आहे. अमरावती विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ३७टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात फक्त ३८ टक्के पेरणी झाली आहे. तर कोकण व नाशिक विभागातही हीच स्थिती आहे.
पेरणीचा आढावा (आकडे हेक्टरमध्ये)
• ५ वर्षाचे सरासरी क्षेत्र - ४,४४,१०९ .
• मागील वर्षीची पेरणी (११.०३.२०२५) - ३,१४,०४०.
• चालू वर्षीची पेरणी (११.०३.२०२६) - २,१२,९३०.
• गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी - ६८ टक्के.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
