सहदेव खोतपुनवत : खवरेवाडी (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ महिपती खवरे यांनी आपल्या दोन गुंठ्यात ७१२५ या बियाण्यापासून चार टन उसाचे उत्पादन घेतले.
सेंद्रिय तसेच मेंढी खताचा वापर करून त्यांनी हा उत्पन्न वाढीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शिराळा पश्चिम भागात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. शेतकरी उसाच्या पूर्व हंगामी व आडसाली लागणी करतात.
परिसरात पशुधनांची संख्या चांगली असल्याने सेंद्रिय खतही उपलब्ध असते. बहुतांश शेतकरी मेंढी खतासाठी मेंढ्यांचे कळप रानात बसवतात. त्यामुळे मातीचा पोत सुधारण्यास मदत होते.
रघुनाथ खवरे यांनी गेल्या जानेवारी महिन्यात ७१२५ ऊस बियाण्याची लागण आपल्या शेतात केली होती. तत्पूर्वी या शेतात खतासाठी मेंढ्या बसवलेल्या होत्या, तसेच काही प्रमाणात रासायनिक खत ही देण्यात आले.
योग्य पीक संगोपन आंतरमशागत व पीक संरक्षणावर अधिक लक्ष देऊन त्यांनी हे पीक जोमात आणले होते. नुकतीच त्यांच्या शेतातील उसाची तोड करण्यात आली. एकेका उसाला तब्बल वीस ते बावीस पेरी आल्या होत्या.
ऊस कारखान्याला पाठवल्यानंतर त्याचे वजन तब्बल चार टन इतके आले. गुंठ्याला सरासरी दोन टनाने त्यांना उत्पन्न मिळाले. परिसरात त्यांचे कौतक होत आहे.
ऊस पिकाची योग्य हंगामात लागण, खताबाबत काळजी तसेच चांगले पीक संगोपन चांगले केल्यास अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. आर्थिक फायदा होतो. - रघुनाथ खवरे, शेतकरी, खवरेवाडी