सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर ११,४४,५९२ मे. टन उसाचे गाळप केले आहे.
सरासरी ११.८१ टक्के साखर उतारा राखत कारखान्याने आतापर्यंत १३,४३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
उत्पादनाचा वेगवान आलेख केवळ साखरच नव्हे, तर उपपदार्थाच्या निर्मितीतही कारखान्याने आघाडी घेतली आहे.
अल्कोहोल उत्पादन ५८,६०,५३३ लिटर, सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६,४१,६७,४८० युनिट्स वीजची महावितरणला विक्री केली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून संचालक मंडळाने पेमेंटचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
तसेच १ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत तुटलेल्या उसाचे टनाला ३३०० रुपये तसेच १०० रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
१६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान तुटलेल्या उसाचे टनाला ३३०० रुपये व १०० रुपये अनुदान १० मार्च रोजी वर्ग होणार आहे.
अनुदान जमा होणार
◼️ मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाचे टनाला ३३०० रुपये व २०० रुपये अनुदान २५ मार्च व १० एप्रिल (हप्ता) आणि ७ दिवसांत अनुदान जमा होईल, अशी माहिती जगताप यांनी दिली.
◼️ फेब्रुवारीनंतर उशिरा ऊस तोडणी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत अध्यक्ष जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.
◼️ १६ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा राखून तो पुढील हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याला पुरवल्यास, अशा शेतकऱ्यांना प्रति मे. टन १०० रुपये जादा अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
आपल्या सर्व सभासद, अधिकारी, कामगार आणि ऊस तोड मजुरांच्या सहकार्यामुळे चालू हंगाम मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात यशस्वीरीत्या संपेल. कारखान्याकडे नोंद असलेल्या प्रत्येक टनाचे गाळप करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरत्या फायद्यासाठी गुऱ्हाळांना किंवा बाहेरील कारखान्यांना ऊस न घालता, कारखान्याकडून मिळणारा दर आणि सवलतींचा विचार करावा. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना
अधिक वाचा: पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; 'ह्या' निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता
