अकोला जिल्ह्याच्या अकोली जहागीर अकोलखेड, रुईखेड, पणज, अंबाडी, राजुरा परिसरासह अकोट तालुक्यातील बागायती भागात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, लाखो रुपये खर्च करूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
केळी उत्पादनासाठी शेतकरी मोठी गुंतवणूक करतात. मात्र, बाजारभावातील चढ-उतारामुळे कधी नफा तर कधी तोटा सहन करावा लागतो. याशिवाय वाढते तापमान, वादळ व गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकदा झाडे व पाने शेतातच जाळून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याचे चित्र आहे.
केळीच्या पानांपासून पत्रावळी तयार करणे तसेच खोडापासून साड्या, दोरखंड व कापड निर्मितीसारखे प्रक्रिया उद्योग परिसरात नसल्याने कच्चा माल वाया जात आहे. अशा उद्योगांना चालना शेतकऱ्यांना मिळाल्यास अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व महिला बचत गटांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्या
शासनाने केळीच्या कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. तसेच महिला बचत गट व सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी मदत करावी, अशी मागणी केळी उत्पादक सुभाष सरोदे यांनी केली आहे.
