अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केली. याबाबतचे निवेदन कोल्हापूरच्या भुदरगड-राधानगरी प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्याकडे देण्यात आले.
यासंदर्भात बुधवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
गेल्या तीस वर्षात काजू व आंबा उत्पादकांना नुकसानभरपाई मागण्याची वेळ कधीच आली नव्हती. मात्र, यंदा हवामानातील अचानक बदल व अवकाळी पावसामुळे काजू व आंबा पिकांचे ९० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कोकणच्या धर्तीवर आंबा उत्पादकांना हेक्टरी पाच लाख रुपये तर काजू उत्पादकांना हेक्टरी तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, कॉ. सम्राट मोरे, संतोष मेंगाणे, धनराज चव्हाण, संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. शिष्टमंडळात कृष्णा भारतीय, मायकल डिसूजा, कुंडलिक गुरव, मानसिंग देसाई, तानाजी देसाई, विश्वास पाटील, युवराज पाटील, प्रमोद सिद्रुक, संजय देसाई, धनश्री हातकर यांच्यासह भुदरगड व आजरा तालुक्यातील काजू-आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
