हर्षल कोल्हे
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (पीएम किसान) लाभ आता एका कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा १८ वर्षे वय पूर्ण असलेल्या मुलांना घेता येणार असून, वारस हक्कानेच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नवीन शेत विकत घेणाऱ्यांसाठी ही योजना आता बंद राहणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याला नवीन सातबारा आणि आठ 'अ' उतारा अनिवार्य राहणार आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरु केलेल्या पीए किसान योजनेच्या(PM Kisan) माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तीन समान हप्त्यामध्ये ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारकडून या नियमात बदल होत असल्याचे समजले आहे.
कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाची २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल तर लाभ घेता येतो. परंतु २०१९ नंतर नवीन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर आलेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे. म्हणून अर्ज केला असला तरी पती लाभ घेत असेल तर पत्नीला हा लाभ घेता येणार नाही. तसेच लाभधारक शेतकऱ्यांचे निधन झाले असेल त्यानंतर त्यांच्या वारसाची वारस हक्काने नोंद झाली असेल तरच त्याच्या वारसाला हा लाभ मिळू शकतो.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे
■ ७/१२ व ८ उतारा
■ पती-पत्नी व १८ वर्षातील अपत्यांचे आधार कार्ड
■ अर्जदाराच्या नावे जमीन असल्यास फेरफार
■ वारस हक्काने खातेदार झाल्यास मयत व्यक्तीच्या नावे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीची जमीन धारण असल्याचा फेरफार
■ कृषी सहायक यांचे भौतिक तपासणी प्रमाणपत्र
■ रेशन कार्ड
नमो सन्मानांसाठी ही हेच नियम
■ केंद्र सरकारची पीएम किसान योजना प्रमाणेच सर्व नियम महाराष्ट्र सरकारच्या 'नमो सन्मान' या योजनेसाठीही लागू असणार आहेत. त्यामुळे ज्यांना पीएम किसानचा लाभ मिळते त्यांनाच नमो सन्मानाचा लाभ घेता येणार असला तरी याआधी अनेकदा पीएम किसानचा लाभ मिळत असला तरी अनेकांना 'नमो सन्मान योजने'चा लाभ मिळाला नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.
नोकरदार, करदात्यांसाठी योजना बंद
■ सरकारी व निमसरकारी नोकरी असेल किंवा करदाता असेल अशा शेतकऱ्याला ही आता पीएम किसान या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यावरून आता फक्त शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार हे निश्चित आहे.
हे ही वाचा सविस्तर : Agriculture Commissioner : कृषी विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष! सव्वा वर्षात ५ नवे कृषी आयुक्त