पीक विमा कंपन्यांच्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक नुकसानभरपाई जमा करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
मागील खरीप व रब्बी हंगामातील ८८ हजार ४१२ शेतकऱ्यांना १०४ कोटी मंजूर असताना ६५ हजार ६२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८९ कोटी ८६ लाख ४० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
खरीप २०२४ हंगामातील पीक नुकसान दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले आहेत.
यातील रक्कम दोन महिन्यांखाली शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, तर उर्वरित ६९ हजार ९५३ शेतकऱ्यांचे ८१ लाख ९५ हजार रुपये शासनाकडून मिळाल्यानंतर जमा करण्यात येतील, अशी भूमिका विमा कंपनीने घेतली होती.
राज्य शासनाने ७ जुलैच्या आदेशान्वये खरीप हंगामाची संपूर्ण रक्कम विमा कंपनीकडे जमा केली. विमा कंपनीने मात्र ४९ हजार शेतकऱ्यांचे ७१ कोटी पाच लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.
रब्बी हंगामातील १८,५०० हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये मंजूर आहेत. विमा कंपनीने १६ हजार ६८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी ८२ लाख रुपये जमा केल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी किती दिवस वाट बघायची?
◼️ मागील वर्षी जुलै महिन्यात विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा भरला होता. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पीक नुकसान झाले होते.
◼️ खरीप हंगामाचे २१ हजार शेतकऱ्यांचे ११ कोटी अद्याप वाटप झाले नाहीत. यावर्षीच्या खरीप हंगामाची काढणीला सुरुवात होण्याचे दिवस आले तरी मागील वर्षांचे पैसे जमा होत नाहीत.
◼️ रब्बी हंगामातील पीक नुकसान भरपाईचीही अशीच स्थिती आहे. शेतकऱ्यांनी किती दिवस वाट बघायची?, हा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पीकांचा विमा भरण्यासाठी महिने ठरवून दिले आहेत. विमा कंपनीकडून केंद्र व राज्य शासनाकडून पैशाची मागणी केली जाते म्हणजे शेतकरी संख्या व रक्कम ठरलेली असते. असे असताना शासनाकडून पैसे मिळाल्यानंतर विमा कंपनी हिशोब सुरू असल्याचे सांगून पीक नुकसान भरपाई जमा केली जात नाही. - मनोज साठे, शेतकरी, वडाळा
अधिक वाचा: पाणंद शेतरस्ते आता कायमस्वरूपी रेकॉर्डवर येणार; भुमी अभिलेख विभागाने घेतला 'हा' निर्णय?