नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात बुधवारी (दि. २१) दिवसभर ढगाळ वातावरण होते. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने शेतकऱ्यांनी गहू, कांदा, हरभरा यासह भाजीपाला व इतर नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तीव्र थंडी जाणवत होती. मात्र, अलीकडे अचानक हवामानात बदल होऊन थंडी कमी झाली आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
निफाड तालुक्यात नद्यांमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर असल्याने बाष्पीभवन वाढते. परिणामी, धुके तयार होऊन त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार रोपे लावावी लागली, तर काहींनी विकतची रोपे घेऊन लागवड केली. त्यामुळे यंदा कांदा पिकाच्या खर्चात आधीच वाढ झाली असून, त्यातच ढगाळ हवामानामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंतित
गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदार आधीच आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मोठा खर्च करूनही साठ ते सत्तर टक्के द्राक्ष बागा फेल गेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मावा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरीही मोठ्या चिंतेत आहेत.
या पिकांवर अधिक परिणाम
• कांदा, गहू व हरभरा या तीन पिकांसाठी थंडी अधिक पोषक मानली जाते.
• मात्र, अलीकडे वातावरणात अचानक झालेला बदल आणि वाढलेले ढगाळ वातावरण यामुळे कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांवर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
• परिणामी, औषध फवारणीचा खर्च वाढून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
थंडीचे प्रमाण घटले; पारा १०.७ अंशांवर
निफाड तालुक्यात मंगळवारी (दि. २०) ७.९ अंश तापमानाची नोंद झाली होती, तर बुधवारी (दि. २१) ढगाळ वातावरणामुळे तापमानात ३ अंशांची वाढ होऊन तापमान १०.७ अंश नोंदवण्यात आले.
सध्या कांदा, गहू, हरभरा व द्राक्ष या पिकांची वाढ मंदावलेली आहे. फुलांचा तसेच फळांचा आकार लहान राहतो आहे. गहू, हरभरा व मका पिकांची पाने पिवळी पडत असून फुलगळही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर उपाययोजना म्हणून रात्रीच्या वेळी शेतीच्या सभोवती धूर केल्यास थंडीचा परिणाम कमी होतो. सकाळी थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करता येईल. - जितेंद्र पोपळे, कृषी सहायक, निफाड.
कांदा पिकाला एकरी ७० ते ८० हजार होणारा खर्च होणा आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. काही प्रमाणात नवीन रोपांची लागवड केली, तर काही विकत घेतली. वाढलेल्या खर्चामुळे चिंता वाढली आहे. - सचिन चकोर, कांदा उत्पादक शेतकरी.
गतवर्षात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता ढगाळ हवामानामुळे द्राक्ष घड तयार होण्यास अडचणी येतात. तापमानात चढ-उतारामुळे द्राक्षावर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकरी दोन लाखांपर्यंत झालेला खर्च देखील निधणे मुश्किल आहे. - विजय पानगव्हाणे, द्राक्ष बागायतदार, उगाव.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
